अकरावी प्रवेश प्रक्रिया १५ पासून सुरू

अकरावी प्रवेश प्रक्रिया १५ पासून सुरू

अकरावी प्रवेश प्रक्रिया १५ पासून सुरू

१४ ला गुणपत्रक; २८ पासून वर्ग सुरू होणार

तुषार सावंत ः सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ५ ः दहावीचा निकाल दोन जूनला जाहीर झाल्यानंतर आता १४ जूनला विद्यार्थ्यांना त्यांचे गुणपत्रक प्रत्येक शाळेमध्ये वितरित केले जाणार आहे. त्यानंतर १५ जूनपासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार असून २८ जूनला अकरावीचे वर्ग सुरू होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची आता धावपळ उडणार आहे.
कोकण परीक्षा मंडळातर्फे दहावीच्या निकालात सिंधुदुर्ग जिल्ह्याने बाजी मारली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रत्यक्षात ९ हजार १२२ जणांनी परीक्षा दिली होती. यात ८ हजार ८९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्यांमध्ये ४ हजार ८१ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यश्रेणी प्राप्त केली आहे. प्रथम श्रेणी ३४२४ विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीत १९९६ आणि पास श्रेणी ८८७ विद्यार्थी आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना आता अकरावी प्रवेशाचे वेध लागले आहेत. कोल्हापूर शिक्षण उपसंचालकांनी सिंधुदुर्ग जिल्हा प्रवेशाचे वेळापत्रक प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयाला कळवले आहे. या वेळापत्रकानुसार १४ जूनला शाळांमध्ये गुणपत्रक वितरणाची व्यवस्था केली आहे. अकरावी प्रवेशासाठीचे वेळापत्रक निश्चित करत असताना अकरावी प्रवेश गुणवत्ता व आरक्षणाच्या धोरणानुसार होणार आहे. यासाठी शाळांना दाखल झालेल्या प्रवेश अर्जानुसार गुणवत्ता व आरक्षण न्याय यादी प्रसिद्ध करावी लागणार आहे. अनुदानित तुकड्यातील विद्यार्थ्यांची क्षमता पूर्ण झाल्यानंतर क्रमाने विनाअनुदानित तुकड्यातील प्रवेश क्षमता पूर्ण करावी लागणार आहे. अकरावी प्रवेश देताना मंजूर क्षमतेपेक्षा जादा प्रवेश देऊ नये. मंजूर तुकड्यांवर अनिष्ट परिणाम होणार नाही. याची दक्षता कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांची राहील. अकरावी प्रवेश देताना विद्यार्थ्यांना, पालकांना त्रास होणार नाही. याची दक्षता कनिष्ठ महाविद्यालयांना घ्यावी लागणार आहे. प्रवेश प्रक्रिया कमीत कमी वेळेत आणि नियोजन पद्धतीने एकत्रितरित्या राबवली जाणार आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी १५ ते १७ जून या कालावधीत प्रवेश अर्ज देणे आणि स्वीकारणे, त्यानंतर १९ जूनला सोमवारी प्रवेश अर्जाची छाननी, तपासणी व गुणवत्तेनुसार निवड यादी आणि प्रतीक्षा यादी फलकावर जाहीर करावी लागणार आहे. २० जूनला सकाळी अकराला निवड यादी व प्रतीक्षा यादी सूचना फलकावर लावणे बंधनकारक आहे. त्यानंतर २२ जूनपर्यंत तीन दिवस निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. २३ आणि २४ जूनला प्रवेश शिल्लक राहिल्या प्रतीक्षा यादीवरील विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्रांच्या आधावर प्रवेश दिला जाईल. २६ आणि २७ जूनला दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रिया होईल. त्यानंतर २८ जूनपासून अकरावीचे वर्ग सुरू होतील, असे शिक्षण उपसंचालक कोल्हापूर येथील महेश चोथे यांनी निवेदनातून जाहीर केले आहे.
---------
एकूण उत्तीर्ण विद्यार्थी ८ हजार ९८९
- १५ ते १७ जून अर्ज देणे व स्वीकारणे
- १९ जून प्रवेश अर्जाची छाननी
- २० जून पहिली निवड यादी
- २० ते २२ यादीनुसार प्रवेश
- २३ ते २४ शिल्लक प्रवेश
- २६ ते २७ दुसऱ्या यादीतील प्रवेश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com