‘शिंदे-फडणवीस सरकार हद्दपार करा’

‘शिंदे-फडणवीस सरकार हद्दपार करा’

09331
सावंतवाडी ः धिक्कार मोर्चात सहभागी महाविकास आघाडीचे पदाधिकारी.

‘शिंदे-फडणवीस सरकार हद्दपार करा’

सावंतवाडीत घोषणाबाजी; वारकरी संप्रदाय, महाविकासतर्फे मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १४ ः वारकरी संप्रदायावर अत्याचार करणारे शिंदे-फडणवीस सरकार राज्यातून हद्दपार करा, अशी मागणी करत सावंतवाडीत महाविकास आघाडी व वारकरी संप्रदायाच्यावतीने येथील तहसील कार्यालयावर धिक्कार मोर्चा काढला.
येथील विठ्ठल मंदिर ते तहसीलदार कार्यालय, अशी पायी वारी करत विठू नामाच्या जयघोषासह शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत नायब तहसीलदार मनोज मुसळे यांना निवेदन सादर केले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, काँग्रेस नेते विकास सावंत, ठाकरे शिवसेना महिला नेत्या जानवी सावंत, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, बाळा गावडे, सायली दुभाषी, मायकल डिसोजा, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, हिदायतुल्ला खान, पुरुषोत्तम राऊळ, इर्शाद बेग, ॲड. दिलीप नार्वेकर, चंद्रकांत कासार, अमिदी मेस्त्री, राघू नार्वेकर, श्रुतिका दळवी, इफ्तिकार राजगुरू, संजय लाड आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व तालुक्यातील वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सावंत म्हणाले, ‘‘हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे; मग अशा सरकारच्या काळात सर्वसामान्य वारकऱ्यांवर केला जाणारा लाठीचार्ज हिंदुत्वाला मान्य आहे का? तसेच हे हिंदुत्वाचे सरकार नसून देशद्रोही आणि गद्दारांचे सरकार आहे.’’ महिला नेत्या सावंत म्हणाल्या, ‘‘वारकऱ्यांवर पोलिसांकडून झालेला लाठीचार्ज हा घडवून आणलेला आहे. त्यात पोलीस बांधवांचा काहीही संबंध नाही. त्यांना हुकूम देऊन ही प्रवृत्ती घडलेली आहे. करोना काळात याच पोलिसांमध्ये वारकऱ्यांनी विठ्ठल पाहिला होता. मग अशाच विठ्ठलाकडून घडवून आणलेला लाठीचार्ज हा निंदनीय प्रकार आहे. त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो.’’ अॅड. नार्वेकर म्हणाले, ‘‘जे नागरिक पंढरपुरात जाऊ शकत नाहीत, ते वारकऱ्यांनाच पांडुरंगाचे रूप समजतात. त्यांच्या समोर नतमस्तक होतात. त्यामुळे पोलिसांकडून झालेला लाठीचार्ज हा केवळ वारकऱ्यांवरील नसून त्याच्या वेदना विठ्ठलालाही पोचल्या असतील.’’ अशा सरकारला येथील जनतेने आणि वारकरी संप्रदायाने यापुढे महाराष्ट्रात थारा देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com