जिल्ह्यात जोरदार सरी

जिल्ह्यात जोरदार सरी

Published on

पान ३ साठी

१४३४२

जिल्ह्यात वाऱ्यासह जोरदार सरी
घरांची किरकोळ पडझड; बळीराजा भात लागवडीच्या तयारीत; नद्या दुथडी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ ः तिन दिवस अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरींचा खेळ गुरूवारी (ता. ६) वाढला. मध्यरात्रीपासून वेगवान वाऱ्यासह दिवसभर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील मोठ्या नद्या दूथडी भरून वाहू लागल्या आहेत. पावसामुळे चिपऴूणात दोन ठिकाणी, राजापूरला दरड कोसळून घर आणि एक शेडचे, रत्नागिरीत विहिरीचे आणि भिंत कोसळल्याने नुकसान झाले.
हवामान विभागाकडून तिन दिवसांचा ऑरेंज अर्लट जाहीर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्याप्रमाणे गुरुवारी पहाटेपासूनच वेगवान वाऱ्‍यासह जोरदार पाऊस सुरू होता. पावसाचा जोर दुपारच्या सुमारास कमी झाला. दोन तास विश्रांती घेतल्यानंतर सायंकाळी पुन्हा पावसाच्या सरी कोसळत होत्या. पावसामुळे शेतकरी राजा समाधानी असून भात लागवडीला लवकरच सुरुवात होणार आहे. पावसामुळे रत्नागिरी तालुक्यात सैतवडे गावामधील वैभव वझे यांच्या घरासमोरील विहिरीजवळील पायवाटेवरून पाण्याचा प्रवाह वेगाने आल्यामुळे मोठा दगड घसरून वाहत विहिरीवर धडकला. तसेच नारळाचे झाड त्याच विहिरीवर पडल्यामुळे सुमारे ३० ते ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. विल्ये गावातील शांताराम विलकर यांच्या घराजवळची भिंत कोसळून अंदाजे ५६ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. जीवितहानी नसल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे कळवण्यात आले आहे. गेल्या चार दिवस पावसाची उघडझाप सुरू होती. पावसाचा फटका चिपळूण, राजापूर तालुक्यांनाही बसला आहे. साखरीनाटे परिसरात अतिवृष्टीने दरड कोसळून कोंबडीपालन शेड जमीनदोस्त होऊन नुकसान झाले तर नाटे येथील जाबीर गडकरी यांचे घर जमीनदोस्त झाले आहे. अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये बर्‍यापैकी वाढ झाली आहे. त्यामुळे संभाव्य पूरस्थितीच्या अनुषंगाने प्रशासनाकडून शहरातील बाजारपेठेतील व्यापारी आणि लोकांसह नद्यांच्या काठावरील लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तुळसवडेतील एका घराची पडझड झाली. चिपळूण कोंढे-करंबवणे मार्गावर कालुस्ते घाटात वृक्ष कोसळून वाहतूक ठप्प्प झाली होती. ग्रामस्थांनी वृक्ष तोडून वाहतूक सुरळीत केली.


चोवीस तासांत
४७.४४ मिमी पाऊस
जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ४७.४४ मिमी तर एकूण ४२७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. राजापूर तालुक्यात सर्वांत जास्त पावसाची नोंद झाली आहे. मंडणगड ३६ मिमी, दापोली २६ मिमी, खेड २२ मिमी, गुहागर ३४ मिमी, चिपळूण ३६ मिमी, संगमेश्वर ४९ मिमी, रत्नागिरी ३१ मिमी, राजापूर १४३ मिमी व लांजामध्ये ५० मिमी. इतका पाऊस पडला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.