सिंधुदुर्गातील राष्ट्रवादी एकसंघच

सिंधुदुर्गातील राष्ट्रवादी एकसंघच

37681
सावंतवाडी ः येथे पत्रकार परिषदेत बोलताना बाळासाहेब पाटील, सोबत अमित सामंत, अर्चना घारे-परब, प्रवीण भोसले आदी. (छायाचित्र ः रुपेश हिराप)

सिंधुदुर्गातील राष्ट्रवादी एकसंघच

बाळासाहेब पाटील ः नाईक पवारांना रस्त्यावर भेटणारे कार्यकर्ते

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ ः राज्यात सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार गटाशी भविष्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे दरवाजे कायमचे बंद राहतील, असे सांगत सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुळ राष्ट्रवादी पक्षात कुठलीही फूट पडली नाही. अजित पवार गटात गेलेले अबीद नाईक हे शरद पवारांना रस्त्यावर भेटणारे कार्यकर्ते होते. ते पक्षाच्या कुठल्याही बैठकीला हजर राहत नव्हते. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी एकसंघ असल्याचे माजी सहकार मंत्री तथा राष्ट्रवादीचे कोकण विभागाचे संपर्क प्रमुख बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
येथे आयोजित मेळाव्यासाठी आलेले श्री. पाटील हे माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष अमित सामंत, कोकण विभागीय महीला अध्यक्ष अर्चना घारे-परब, जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डॉन्टस, प्रसाद रेगे, अनंत पिळणकर आदी उपस्थित होते.
श्री. पाटील पुढे म्हणाले, ‘‘अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला आहे. भविष्यात शरद पवार गटाशी अजित पवार गट मिळणार असा संभ्रम काहीजण निर्माण करत आहेत; परंतु, अजित पवार गटाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. त्यामुळेच पक्षाच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाकडे अजित पवार गटाच्या विरोधात धाव घेण्यात आली आहे. राज्यात महाविकास आघाडी २०१९ मध्ये सत्तेत आली. या काळात कोरोना आला. परंतु, राज्यात उत्तरप्रदेश, गुजरातसारखी परिस्थिती होऊ दिली नाही. केंद्राचे निर्बंध राज्याने पाळले; परंतु, जनतेला त्रास होईल, असे कोणतेही कृत्य महाविकास आघाडीने केले नाही. इतर राज्यात मृत्यूचा खच पडत असताना राज्यात कोरोना काळात महाविकास आघाडीने चांगल्या प्रकारे परिस्थिती हाताळली.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘सध्या राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. कोणाचे कोणावरच निर्बंध नाहीत. आता तर कंत्राटी पद्धतीने पोलिस भरती होत आहे. सध्या अनेक पोलिस अधिकारी लाचखोरीमध्ये सापडत आहेत. सावंतवाडीतील दोन पोलिस अधिकारी लाचखोरीत मिळाले आहेत. शासनाचे बंधन असताना हे अधिकारी लाच घेतात. मग, कंत्राटी पोलिसांवर कुणाचेच बंधन नसणार. त्यामुळे त्यांना मोकळे रान मिळणार आहे.’’
ते म्हणाले, ‘‘दोन्ही जिल्ह्यात पक्षाला विधानसभा जागा सोडण्यात याव्या, यासाठी प्रयत्न करण्यात येईल. भविष्यात इंडिया आघाडी होणार असल्यामुळे जागांची तडजोड होणार आहे. त्यामुळे आत्ताच कुठल्या जागा सुटणार, हे आम्ही सांगू शकत नाही. परंतु, ज्या जागा सुटणार आहेत, त्या ठिकाणी आमची तयारी आहे. त्यासाठीच आम्ही सावंतवाडीत मेळावे घेत आहोत. पक्षात पडलेल्या फुटीचा सिंधुदुर्गात काहीच परिणाम झाला नाही. अबिद नाईक पक्षाच्या कुठल्याच कार्यक्रमाला येत नव्हते. ते पवारांना रस्त्यावर भेटणारे कार्यकर्ते होते. शाळा दत्तक देण्याच्या योजनेला पक्षाचा विरोधाच राहणार.’’
----------------
चौकट
पक्ष वाढीसाठी प्रयत्न
माझ्याकडे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारी आहे. या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी मी लक्ष देणार आहे. देशातील जनता महागाईने त्रस्त असून भाजपाला ती कंटाळली आहे. त्यामुळे भविष्यात केंद्रात इंडिया आघाडी आणि राज्यातही महाविकास आघाडी सत्तेत येईल, असा विश्वासही श्री. पाटील यांनी व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com