केसरकरांनाचा आरामाची गरज

केसरकरांनाचा आरामाची गरज

swt2519.jpg
79868
कुडाळ ः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटाच्या येथील तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना आमदार वैभव नाईक. व्यासपिठावर उपस्थित अमित सामंत, प्रसाद रेगे, संजय पडते, अमरसेन सावंत.

केसरकरांनाचा आरामाची गरज
अमित सामंतः राऊतांवरील टिकेला प्रत्युत्तर
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २५ः आरामाची गरज विनायक राऊत यांना नाही तर दीपक केसरकरांना जास्त आहे. म्हणून त्यांनी व्हॅनिटी व्हॅन आणली आहे. त्यात त्यांनी आराम करावा, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आज येथे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना दिले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटाच्या कुडाळ तालुका कार्यकारिणीची बैठक झाली.
केसरकरांनी काल (ता.२४) राऊत यांच्यावर टिका केली होती. याला श्री. सामंत यांनी या बैठकीत प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, "केसरकरांचे प्रत्येक निवडणुकीतले नेते वेगवेगळे असतात, असा आमचा आजपर्यंतचा अनुभव आहे. गेली २४ वर्षे आम्ही बघतोय. शरद पवार त्यांचे ते ज्यावेळी नेते होते, त्यावेळी राणेंच्या विरोधात त्यांनी कसे रान उठवले, ते आम्ही पाहिलेयं. आम्ही त्यावेळी त्यांच्याबरोबर होतो. आता त्यांची भूमिका वेगळी आहे. जसा वारा येईल तशी पाठ फिरवणे हे त्यांचे पहिले उद्दिष्ट असते. त्यामुळे व्हॅनिटीत बसून आरामाची खरी गरज केसरकरांना आहे."
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संबोधिताना श्री. सामंत म्हणाले, "मतदानाला आता शेवटचे आठ ते दहा दिवस शिल्लक आहेत. ही निवडणूक आता जनतेची झाली आहे. जिथे गद्दार ऊभे आहेत, तिथे त्यांच्या विरोधात खुद्दार उभे आहेत. जनतेने ही निवडणूक आपल्या हातात घेतली आहे. राष्ट्रवादी एकदिलाने महाविकास आघाडीचे काम करत आहे. बैठकांना चांगला प्रतिसद मिळत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभेची निवडणूक सुद्धा डोळ्यासमोर ठेवून काम केले पाहिजे. मोदी सरकार विरोधात लोकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. लोक त्यांना नक्की जागा दाखवतील. महाविकास आघाडीचे चिन्ह नवीन आहे. हे मशाल चिन्ह घराघरात पोचवले पाहिजे. कार्यकर्त्यांनी राऊत नाही तर शरद पवार उभे आहे, असे समजून मतदान करा. त्यांच्या अपमानाचा बदला घेण्याची ही वेळ आहे."
आमदार वैभव नाईक म्हणाले, "या निवडणुकीनंतर निवडणूक होतील की नाही असा प्रश्न आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका अजून झाल्या नाहीत. एकाच व्यक्तीच्या हातात देश जातोय की काय, अशी भीती आहे. २००९ पासूनच राष्ट्रवादी आम्हाला मदत करत होते. केसरकर यांनी १ कोटी रुपयांची व्हॅनिटी जमीन विकून घेतली की खोक्यातून या निवडणूककीनंतर अजित पवारांसोबत ५ आमदार सुद्धा राहणार नाहीत. लोकसभेच्या निकालानंतर सर्वजण शरद पवारांसोबत येणार आहेत."
ते म्हणाले, "जिल्ह्यात वनसंज्ञा कोणाच्या नेतृत्वाखाली लागली? राणेंनी महसूलमंत्री असताना वनसंज्ञा लावली. विरोधकांचा आवाज दडपला. आम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून आणले. महिला हॉस्पिटल उभारले; पण हे सरकार त्यासाठी डॉक्टर्सही देत नाहीत. कार्डियक लॅब जिल्ह्याबाहेर गेली. हे या सरकारचे अपयश आहे. जिल्हयातील चार चार मंत्री असून काय उपयोग?"
राष्ट्रवादीचे प्रसाद रेगे यांनी ही आरपारची लढाई असून अबकी बार चारसो पार नाही तर आर की पार असे म्हटले पाहिजे. श्री. राऊत यांना पुन्हा संसदेत पाठवायचे आहे. त्यासाठी निवडणुकीदरम्यान सजग रहा. बेसावध राहिलो तर पुन्हा निवडणूका होतील की नाही सांगता येत नाही. त्यामुळे इंडिया आघाडीच्या पाठीशी राहा, असे सांगितले. यावेळी संजय पडते, अमरसेन सावंत, राजन नाईक, बाळ कानयाळकर, सावनी पाटकर यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. राऊत खासदार म्हणून संसदेत जावेत यासाठी सद्गुरू बाळू मामांच्या भक्त सौ. अंकिता ठाकूर यांनी आठ दिवस अनवाणी चालण्याचे व्रत केले होते. त्यांचा आमदार नाईक यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सौ. ठाकूर यांनी सुप्रिया सुळे यांना द्यायला सद्गुरू बाळूमामांची मूर्ती श्री. सामंत यांच्याकडे सुपूर्द केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन पाटकर यांनी केले. यावेळी तालुका प्रमुख राजन नाईक, युवासेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, शिवाजी घोगळे, आत्माराम ओटवणेकर, बाळ कनयाळकर, भास्कर परब, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना उबाठा गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------

swt2520.jpg
79869
केसरीः येथील सभेत बोलताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर. व्यासपीठावर उपस्थित महेश सारंग, अशोक दळवी, राजन पोकळे, राघोजी सावंत व मान्यवर.

गावच्या प्रगतीसाठी राणेंना साथ द्या
दीपक केसरकर ः केसरीतील सभेत आवाहन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ ः रस्ते, पाणी, वीज पुरवठा झाला तरी गावात आर्थिक प्रगती झाली पाहिजे. यासाठी आपणास काम करायला पाहिजे. जिल्हा देश प्रगतीपथावर नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना ९० टक्के पेक्षा जास्त मताधिक्य मिळवून द्या, असे आवाहन शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी केले.
भाजप महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री राणे यांच्या प्रचारार्थ श्री. केसरकर यांनी केसरी येथे दशक्रोशीतील पदाधिकाऱ्यांची सभा घेतली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, "पंतप्रधान मोदी यांनी देश कणखर बनविला. शेजारील राष्ट्र भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत दाखवू शकत नाही. देशाचा सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सारे काही पंतप्रधान यांनी केले आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीत मोदी यांचा सिंहाचा वाटा आहे. देशाची प्रगती हा आपला स्वाभिमान आहे. उमेदवार श्री. राणे यांचे मोठे कर्तुत्व आहे. त्यांच्या कामगिरीबाबतीत पंतप्रधान, राष्ट्रपती यांनी कौतुक केले आहे."
केसरकर पुढे म्हणाले, "सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सिंधुरत्न योजनेतून ग्रामीण कृषी पर्यटन, कुक्कुटपालन, शेळीपालन, गो-पालन अशा विविध योजनांची अंमलबजावणी होत आहे. काजू बी ला प्रतिकीलो हमीभाव मिळावा म्हणून प्रयत्न केले. आंबोली कबुलायतदार गावकर जमीन वाटप निर्णय झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. स्वाभिमान हा सावंतवाडीचा केंद्रबिंदू आहे. आपली संस्कृती विकासाची आहे. त्यामुळेच गावातील वाद विकासाच्या आड येऊ नये याची काळजी घ्या."
भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग म्हणाले, "श्री. राणे कोकणाची चांगली सेवा करत आहेत. विरोधी पक्षाचे उमेदवार निष्क्रिय आहेत. राणे यांना मतदान करण्याची आपणास प्रथमच संधी मिळाली आहे. या मतदारसंघातून जिल्ह्यात मोठे मताधिक्य मिळाले आणि विजयी झाले तर पुन्हा केंद्रीय मंत्री होतील. राऊत यांचा विकास निधी दहा वर्षांत किती गावात पोहचला ? आपल्यातील मतभेद दूर करून यापुढेही प्रत्येक निवडणुकीत यश प्राप्त करण्यासाठी पुढाकार घेऊयात. गोरगरीब जनतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजना राबविल्या आहेत. त्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवा." यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, उपतालुकाप्रमुख राघोजी सावंत, महिला जिल्हाध्यक्षा अॅड. निता सावंत कविटकर, दिनेश गावडे आदींनी विचार मांडले. यावेळी भाजपचे मंडळ अध्यक्ष रवींद्र मडगावकर, विधानसभा अध्यक्ष प्रेमानंद देसाई, विनायक दळवी, रूपेश पावसकर, तालुकाप्रमुख नारायण राणे, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, गुंड जाधव, हनुमंत सावंत, संदेश गुरव व मान्यवर उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com