सिंधुदुर्गातील लाचखोरीवर सीबीआयची नजर

सिंधुदुर्गातील लाचखोरीवर सीबीआयची नजर

८११४८


सिंधुदुर्गातील लाचखोरीवर सीबीआयची नजर
पथक दाखल ः केंद्राच्या कार्यालयांबाबत थेट तक्रारीची व्यवस्था
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २ ः केंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या जिल्ह्यातील शासकीय कार्यालयामधील लाचखोरीवर आता सीबीआयची करडी नजर असणार आहे. केंद्राच्या सेंट्रल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन अर्थात सीबीआयचे एक पथक आज जिल्ह्यात दाखल झाले. या विभागाकडे लाचखोरीची थेट तक्रार करता येणार आहे. उद्या (ता. ३) पर्यंत ते याबाबत जनजागृती करतील.
केंद्राच्या सेंट्रल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन विभागातील अँटी करप्शन ब्रँचचे पोलिस निरीक्षक प्रेम कुमार आणि पोलिस उपनिरीक्षक पवण कुमार आणि अन्य एक हवालदार अशी टीम जिल्ह्यात आज दाखल झाली आहे. आपले पथक जिल्ह्यात कोणत्या कारणासाठी दाखल झाले आहे. याची माहिती पोलिस निरीक्षक प्रेम कुमार यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन दिली. यावेळी पवण कुमार उपस्थित होते.
पोलिस निरीक्षक प्रेम कुमार म्हणाले, ‘‘सीबीआय कोणत्या विभागाची चौकशी करू शकते, याबाबत नागरिकांना माहिती नसते. केंद्र सरकार अखत्यारीत येणाऱ्या एखाद्या कार्यालयात लाच स्वीकारली जात असेल, लाच घेतल्याशिवाय काम होत नसेल तर त्याची तक्रार कोणाकडे करावी, असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे काही नागरिक राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करतात; परंतु त्यांना अपेक्षित सहकार्य किंवा यश मिळत नसते. त्यामुळे याबाबत जनजागृती करण्यासाठी आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलो आहोत. पूर्ण राज्यभर आमचा असा कार्यक्रम सुरू आहे. आतापर्यंत सीबीआय मुंबईसारख्या मोठ्या शहरांत कार्यरत होती; परंतु राज्यातील अन्य जिल्ह्यांत असे प्रकार घडत असल्याने तेथेही सीबीआयने काम करावे, असे अँटी करप्शन ब्राँचचे प्रमुख डॉ. सदानंद दाते यांना वाटत असल्याने हा निर्णय आम्ही घेतला आहे.’’
ते म्हणाले, ‘‘आज आम्ही एलआयडी, प्राप्तिकर, बीएसएनएल अशा चार कार्यालयांना भेटी दिल्या असून येथे पोस्टर लावले आहेत. नागरिकांनी केंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या कोणत्याही कार्यालयांत काम करण्यासाठी पैशांसाठी अडवणूक होत असल्यास, एखाद्या कर्मचारी, अधिकाऱ्याने पगारापेक्षा जास्त मालमत्ता जमविली असल्यास तसेच अन्य अॅपचा वापर करून लाच घेतली जात असल्यास आम्हाला माहिती द्यावी. आम्ही आमच्या स्तरावर शहानिशा करून संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी यांच्यावर ट्रॅप लावून कारवाई करू.’’

चौकट
या विभागांची
तक्रार करू शकता
पोस्ट, रेल्वे, बीएसएनएल, प्राप्तिकर, कस्टम, जीएसटी, एलआयसी, पीएसआयसी, न्यू इंडिया इन्श्युरन्स कंपनी, राष्ट्रीय बँका या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी लाच घेत असल्यास तक्रार करता येणार आहे. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे. ८४३३७००००० या व्हॉटस्‌ अॅप क्रमांकावर मॅसेज पाठवून, ०२२ - २६५४३७०० या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून किंवा SP१acmum@cbi.gov.in या ई-मेलवर मेल पाठवून तक्रार करता येणार आहे.


चौकट

२०१५ नंतर कारवाई नाही
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सीबीआयने शेवटची कारवाई २०१५ मध्ये केली आहे. बीएसएनएल विभागाचे तत्कालीन जिल्ह्याचे प्रमुख असलेल्या अधिकाऱ्यावर ही कारवाई झाली होती. त्यानंतर आतापर्यंत एकही कारवाई झालेली नाही; परंतु नागरिकांना याबाबत तक्रार कोणाकडे करावी, हे माहीत नसल्याने ही कारवाई होऊ शकलेली नाही. आम्ही केलेल्या कारवाईतून आरोपी सुटत नाही. आमची यंत्रणा सक्षम आणि वेगळी आहे. त्यामुळे यावर विश्वास ठेवून नागरिकांनी तक्रार दाखल करावी. तुमचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे प्रेमकुमार यांनी आश्वस्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com