सिंधुदुर्गच्या जडणघडणीत ‘सकाळ’चा मोठा वाटा

सिंधुदुर्गच्या जडणघडणीत ‘सकाळ’चा मोठा वाटा

82847
सावंतवाडी ः येथील मँगो हॉटेलमध्ये ‘सकाळ’ ने प्रसिद्ध केलेल्या ‘जाऊ देवाचिया गावा’ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी उपस्थित ‘सकाळ’चे सरव्यवस्थापक (दक्षिण महाराष्ट्र) यतीश शहा, युवराज लखम सावंत-भोसले, जाहिरात व्यवस्थापक आनंद शेळके, वितरण व्यवस्थापक महेश डाकरे आदी.

सिंधुदुर्गच्या जडणघडणीत ‘सकाळ’चा मोठा वाटा

युवराज लखम सावंत-भोसले ः ‘जाऊ देवाचिया गावा’चे सावंतवाडीत प्रकाशन

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १० ः दैनिक ‘सकाळ’ कायम सकारात्मक ऊर्जा पेरण्याचे काम करत आला आहे. सिंधुदुर्गच्या जडणघडणीत प्रसार माध्यम म्हणून ‘सकाळ’चा महत्त्वाचा वाटा आहे, असे प्रतिपादन येथील संस्थानचे युवराज तथा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखम सावंत-भोसले यांनी व्यक्त केले.
‘सकाळ’ने प्रसिद्ध केलेल्या ‘जाऊ देवाचिया गावा’ या पुस्तिकेचे प्रकाशन आज मान्यवरांच्या उपस्थितीत हॉटेल मॅंगो येथे झाले. यावेळी युवराज लखम सावंत भोसले बोलत होते. व्यासपीठावर ‘सकाळ’चे सरव्यवस्थापक (दक्षिण महाराष्ट्र) यतीश शहा, ‘सकाळ’ कोल्हापूर विभागाचे जाहिरात व्यवस्थापक आनंद शेळके, वितरण व्यवस्थापक महेश डाकरे, सैनिक पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ, ‘सकाळ’चे प्रिन्सिपल करन्स्पॉडंट शिवप्रसाद देसाई आदी उपस्थित होते.
श्री. सावंत-भोसले म्हणाले, ‘‘सकाळने नेहमी सकारात्मक लिखाण केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची धार्मिक आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गावागावांमध्ये ग्रामदेवतेची मंदिरे आहेत. प्रत्येक देवस्थानची वेगळी आख्यायिका आहे. ही आख्यायिका आत्ताच्या पिढीला माहिती व्हावी, यासाठी या पुस्तकाच्या माध्यमातून ‘सकाळ’ने देवस्थान विषयी माहिती प्रसिद्ध केली ही कौतुकास्पद बाब आहे. आज या ठिकाणी मोठी शोकांतिका म्हणजे येथील भूमिपुत्र आपल्या जमिनी परप्रांतियांच्या घशात घालत आहेत. भूमिपुत्रांनी त्या न विकता त्यामध्ये मेहनत करून उत्पन्नाचा मार्ग शोधण्यास निश्चितच रोजगार उपलब्ध होऊ शकतो. यासाठी प्रबोधन होणे गरजेचे आहे. ‘सकाळ’ने यावर प्रकाशझोत टाकावा. भविष्यात राजघराण्यातर्फे ‘सकाळ’च्या सहकार्याने सामाजिक कार्यात काम करण्यास निश्चितच आवडेल.’’
श्री. शहा म्हणाले, ‘‘कोकणाची भौगोलिक रचना आणि येथील लोकांच्या धार्मिक अध्यात्मिक वारसा जपला जावा, त्यासाठी ही पुस्तिका प्रकाशित केली आहे. अशा प्रकारची पुस्तिका ‘सकाळ’ युनिटमध्ये प्रथमच प्रकाशित करण्यात आली आहे. यापुढेही येथील धार्मिक वारसा जपण्यासाठी ‘सकाळ’ नेहमीच प्रयत्न करेल. ‘सकाळ’ माध्यम समूह समाजकार्यात नेहमीच अग्रेसर आहे. याच हेतूने सावंतवाडी शहराच्या विकासासाठी येणाऱ्या काळात ‘सावंतवाडी डेव्हलपमेंट फोरम’ या बॅनरखाली सर्वांनी एकत्र येऊन काम करुया.’’
सैनिक पतसंस्थेचे श्री. राऊळ म्हणाले, ‘‘गावा गावातील देवस्थानाची माहिती, तेथील प्रथा परंपरा वाचकापर्यंत पोहोचवण्याचा आगळा वेगळा विषय ‘सकाळ’ने हाती घेतला. जिल्ह्यातील विशेषतः कोकणातील देवस्थाने खूप वशिष्ट्यपूर्ण आहेत. ही देवस्थाने बारा पाच या मर्यादेची असतात. पूर्वी ज्यावेळी कायदा अस्तित्वात नव्हता तेव्हा या मंदिराच्या गाभाऱ्यात बसून गावातील परंपरा, रिती, अटी, शर्ती ठरवल्या जात असत. आजही बऱ्याच गावात याच रुढी-परंपरा देवाची श्रद्धा म्हणून चालवल्या जात आहेत आणि लोकांची हीच श्रद्धा सकाळने सर्वांसमोर नेली आहे.’’
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मायकल डिसोजा म्हणाले, ‘‘जिल्ह्यात रोजगार नसल्याने तरुण-तरुणी मुंबई, पुणे तसेच नजीकच्या गोव्यात जात आहेत. त्यामुळे या ठिकाणी रोजगार येण्यासाठी ‘सकाळ’ने लिखाणाच्या माध्यमातून आवाज उठवावा.’’ प्रभावती कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे संदीप देवळी, निवृत्त कर्मचारी (बॅंक ऑफ महाराष्ट्र) पॉली परेरा, सैनिक पतसंस्थेचे सरव्यवस्थापक सुनील राऊळ, सैनिक पतसंस्थेचे अध्यक्ष बाबुराव कविटकर, सैनिक स्कूल आंबोलीचे व्यवस्थापक दीपक राऊळ, स्नेहनागरी पतसंस्था व नॅब संस्था सिंधुदुर्गचे अध्यक्ष अनंत उचगावकर, सावंतवाडी आयुर्वेद महाविद्यालयाचे डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, सावंतवाडी कॅथॉलिक बॅंकेचे एव्हरेस्ट मेंडीस, सावंतवाडी रोटरी क्लब अध्यक्ष सुहास सातोसकर, माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, वेत्ये येथील सामाजिक कार्यकर्ते बाळू गावकर आदी उपस्थित होते. यावेळी सावंतवाडीचे बातमीदार रुपेश हिराप, निखिल माळकर, नीलेश मोरजकर, पराग गावकर, दीपेश परब, संदेश देसाई, संदिप चव्हाण व सौ. स्वरा चव्हाण तसेच ‘सकाळ’च्या येथील कार्यालयाचे जाहिरात विभागाचे हेमंत खानोलकर, गौतम बुद्धघोष, कर्मचारी सुभाष तोरसकर, संपादकीय विभागाचे जॉन्सन फर्नांडीस, संतोष ठाकूर उपस्थित होते.
------------
चौकट
‘त्या’ बातमीची पंतप्रधानांकडून दखल
केसरी (ता.सावंतवाडी) अलाटीवाडी या ठिकाणी पाण्याचा प्रश्न गंभीर होता. जवळपास तीनशे फूट खोल दरीत उतरून जनता पाण्यासाठी वणवण करत होती. ‘सकाळ’ने यावर प्रकाशझोत टाकताना लिखाण केले आणि याची दखल खुद्द देशाचे पंतप्रधान यांनाही घ्यावी लागली. आज ‘सकाळ’च्या एका बातमीमुळे अलाटीवाडी येथील पाणी प्रश्न कायमचा मिटला आहे. जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होण्यामध्येही सकाळचा मोठा वाटा आहे. त्यामुळे सकाळ हे जनतेप्रती आवाज उठवणारे वृत्तपत्र आहे, असे श्री. ठाकरे यांनी व्यक्त केले.
-----------
चौकट
मोबाईल अतिवापर, व्यसनाधीनतेवर ‘सकाळ’ने आवाज उठवावा
आजचा तरुण वर्ग व्यसनाधीनतेकडे वळू लागला आहे. ती दूर करण्यासाठी आणि दुसरीकडे मोबाईलचा अतिवापर लहानापासून मोठ्यांमध्ये होऊ लागला असल्याने त्याचे वाईट परिणाम दिसून येऊ लागले आहेत. त्यामुळे या दोन्ही गोष्टीवर ‘सकाळ’ने सकारात्मक लिखाण करून आवाज उठवावा, अशी मागणी श्री. उचगावकर यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com