कार्यकर्त्यांच्या नजरा रत्नागिरीकडे

कार्यकर्त्यांच्या नजरा रत्नागिरीकडे

87607
87608

कार्यकर्त्यांच्या नजरा रत्नागिरीकडे

मतमोजणीची उत्कंठा : तुल्यबळ लढती आल्या पुन्हा चर्चेत

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ३ : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीतील मतदानानंतर जवळपास महिन्‍याभराने उद्या (ता. ४) रत्नागिरी येथे मतमोजणी होणार आहे. याबाबत राजकीय मंडळींबरोबरच सर्वसामान्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. काहींना तर स्थानिक निवडणुकीच्या निकालाबरोबरच राज्यातील दिग्गज मंडळींचे काय होणार? सरकारचे भवितव्य कसे असणार? याबाबतही उत्सुकता आहे. स्थानिक कार्यकर्ते निकालासाठी उद्या रत्नागिरीला जाण्याच्या नियोजनात आहेत.
यावेळची लोकसभा निवडणूक अनेकांच्या दृष्टीने कसोटीची, राजकीय भवितव्याची, अस्तित्वाची, निर्णायक तसेच कोकणवर खरी पकड कोणाची, हे सांगणारी आहे. बॅ. नाथ पै यांच्या काळात देशासह परदेशातही निकालाची उत्सुकता असायची. तद्वतच यावेळच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निकालाकडे राज्यातील जनतेसह विविध राजकीय पक्षांतील नेतेमंडळींचे संपूर्ण लक्ष असणार आहे. माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नावाभोवती मोठे राजकीय वलय आहे. आजवर त्यांनी मुख्यमंत्री पदासह विविध मंत्रिपदे भूषविल्यामुळे ‘वजनदार नेते’ म्हणून त्यांची ओळख आहे. तत्कालीन खासदार नीलेश राणे यांचा पराभव करून खासदार झालेल्या विनायक राऊत यांनी गेली दहा वर्षे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. शिवसेनेच्या झंझावातानंतर ‘कोकण म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला’ हे समीकरण बनले. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्यापासून ही परंपरा कायम होती; मात्र तत्कालीन स्थितीत नारायण राणे आणि पर्यायाने नीलेश राणे काँग्रेसवासी झाले आणि त्याला छेद दिला गेला. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन शिवसेनेने विनायक राऊत यांच्या माध्यमातून गतवैभव परत मिळविले. इतकेच नव्हे तर कोकणातील बहुतांशी विधानसभा मतदारसंघ जिंकून तत्कालीन शिवसेनेने आपली राजकीय पकडही घट्ट केली. त्यानंतर अनेक राजकीय स्थित्यंतरे झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्कालीन शिवसेना पक्षाचे विभाजन होऊन शिंदे गट स्वतंत्र झाला. त्यासोबत आजवर निवडणुकीतील पक्षाची ‘धनुष्यबाण’ ही निशाणी देखील ठाकरे गट शिवसेना पक्षापासून दुरावली. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत ‘धनुष्यबाण’ ऐवजी ‘मशाल’ हाती घेण्यात आली. मतदानानंतर पुन्हा एकदा तो निर्णायक क्षण आला असून, राणे यांच्यासह राऊत आणि ठाकरे गट शिवसेना तसेच भाजपचे भवितव्य ठरवणारा निकाल उद्या लागणार आहे. कोकणवर खरी पकड कोणाची, हे सांगणारी ही निवडणूक आहे.
--
राज्यातील लढती, केंद्रातील सत्तेकडे लक्ष
भाजप प्रथमच मतदारसंघाच्या मैदानात उतरल्यामुळे तसेच शिवसेनेचा ठाकरे गट हा राणे यांचा राजकीय शत्रू असल्यामुळे यावेळी चुरस आणखीनच वाढली आहे. राणेंचे राजकीय साम्राज्य आणि शिवसेनेचा बुरूज अबाधित ठेवण्यासाठी धडपड आहेच. त्यामुळे निकालाची उत्कंठा अधिकच वाढली आहे. रत्नागिरी येथे मतमोजणी होणार असल्याने प्रमुख दोन्ही तुल्यबळ उमेदवारांचे कार्यकर्ते रत्नागिरी येथे जाण्यासाठी तयारीत आहेत. ७ मे रोजी मतदान झाल्यानंतर मध्यंतरीच्या काळात शिथिल झालेली राजकीय चर्चा आता पुन्हा तेज झाली आहे. सर्वसामान्यांना स्थानिक निकालाची उत्सुकता तर आहेच; परंतु राज्यातील प्रमुख लढतींसह केंद्रातील सत्तेचे गणित काय असेल, याची उत्कंठा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com