रत्नागिरी जिल्ह्यात नेते फुटले, कार्यकर्ते ठाम

रत्नागिरी जिल्ह्यात नेते फुटले, कार्यकर्ते ठाम

रत्नागिरी जिल्ह्यात नेते फुटले, कार्यकर्ते ठाम

मूळ शिवसैनिकांचा इंगा; तीनही मतदार संघांत राऊतांना आघाडी

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात राणे विजयी झाले, हा अंदाज खरा ठरला; मात्र भल्याभल्यांनी वर्तवलेल्या या अंदाजांतर्गत जे कयास बांधले होते ते मात्र पार रसातळाला गेले. मतदार हुशार की, कार्यकर्ते हुशार असा प्रश्न या निकालाची आकडेवारी पाहिल्यानंतर पडतो. रत्नागिरी जिल्ह्यातील मूळ शिवसेनेतील नेते जरूर फुटले; मात्र कार्यकर्ते जाग्यावरच आहेत. त्यांना जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी मतपेटीतून खणखणीतपणे हे दाखवून दिले. फुटीर कोण, गद्दार कोण, निष्ठावान कोण? अशा साऱ्या शेलक्या टीकात्मक प्रश्नांना कार्यकर्त्यांनी उत्तर दिले आहे.
रत्नागिरी, राजापूर व चिपळूण या तीन विधानसभा मतदार संघांतून विनायक राऊत यांनी राणे यांच्यावर ५० हजारांहून अधिक मतांची आघाडी घेतली आहे. शिवसैनिक राऊतांच्या पर्यायाने उद्धव ठाकरे यांच्यामागे ठामपणे उभा राहिला, असा निष्कर्ष यातून निघतो. रत्नागिरी मतदार संघ हा तर शिंदे गटाचा बालेकिल्ला; मात्र येथे विनायक राऊत यांना राणे यांच्यापेक्षा दहा हजारांहून अधिक मतांची आघाडी मिळाली आहे. याचा स्पष्ट निष्कर्ष असा की, नेत्यांमागून कार्यकर्ते मतदान करायला गेले नाहीत. त्यांनी आपली निष्ठा कायम राखली असा दावा मूळ शिवसेनेतील कार्यकर्ते, नेते करत होते तोच खरा ठरला. चिपळूण विधानसभा मतदार संघात शेखर निकम यांनी गेल्या विधानसभेला एक लाखांहून अधिक मते मिळाली होती. त्यांच्या विरोधात लढलेले शिवसेनेचे सदानंद चव्हाण यांना ७१ हजार मते मिळाली. या वेळी हे दोन्ही एकत्र होते. राष्ट्रवादीतील येथील फूट कितीही मोठी मानली तरी वरचष्मा निकम यांचाच असेल असे ठामपणे सांगितले जात होते. सदानंद चव्हाण हे तर शिंदे गटात सामील झाले. शिवसेनेच्या फुटीमुळे त्यांच्याही पदरातील काही मते राणेंना मिळतील असा होरा होता; मात्र चिपळूण मतदार संघात सुमारे २० हजारांहून अधिक मताधिक्य राऊत यांनाच मिळाले आहे.
राजापूर मतदार संघात उद्धव ठाकरे गटाचेच आमदार आहेत तेथेही गेल्या वेळचे प्रतिस्पर्धी असलेला काँग्रेस पक्ष या वेळी सोबत होता. राजापुरात राऊत यांना २० हजाराची आघाडी मिळाली; मात्र शिवसेनेत फूट पडण्याचा तसेच आमदार राजन साळवी यांना वेगळ्या पद्धतीने नामोहरम करण्याचा प्रयत्न झालेला साऱ्यांनाच ज्ञात आहे. अशा परिस्थितीमध्ये तेथे आवश्यक ती फूट पाडून राऊत यांचे मताधिक्य कमी करता आले नाही. म्हणजे तेथेही कार्यकर्ता ठाम राहिल्याचे प्रमाण अधिक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com