२२ कुटुंबानी स्थलांतराच्या नोटीसा धाडल्या परत

२२ कुटुंबानी स्थलांतराच्या नोटीसा धाडल्या परत

‘त्या’ कुटुंबाकडून स्थलांतराच्या नोटीसा परत

परशुराम घाट चौपदरीकरण ; उपाययोजनेकडे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा ः
चिपळूण, ता. ७ ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात चौपदरीकरणाची कामे मार्गी लागली. मात्र पेढे परशुराम मधील ग्रामस्थांच्या मागणीनुसार घाटात व घाटाच्या वरील बाजूस सुरक्षेच्या उपाययोजना राबवलेल्या नाहीत. सलग तिसऱ्या वर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर तहसील कार्यालयाने २२ कुटुंबाना स्थलांतराच्या नोटीसा दिल्या आहेत. पावसाळ्याच्या तोंडावरच केवळ नोटीसा दिल्या जातात, सुरक्षेच्या उपाययोजना राबवल्या जात नाहीत. त्यामुळे या ग्रामस्थांनी या नोटीसा न स्वीकारता त्या परत पाठवल्या आहेत.
आपत्तीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी महसूल प्रशासनाकडून धोकादायक ठिकाणच्या नागरिकांना ताप्तुरत्या स्थलांतराच्या नोटीसा दिल्या जातात. ३ किमी लाबींच्या परशुराम घाटातील डोंगर कटाईमुळे डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पेढे आणि माथ्यावरील परशुराम गावातील ग्रामस्थांना धोका निर्माण झाला आहे. डोंगर कटाईवेळी दुर्घटना घडल्या. पावसाळ्यात डोंगराचा भराव खाली आल्याने अनेकवेळा वाहतुकीसाठी घाट बंद केला गेला. घाटातील डोंगर खोदल्याने जमीन सैल झाली आहे. गेल्यावर्षी अनेकवेळा येथे दरड कोसळली होती. एका बाजुला परशुरामच्या घरांना धोका आहे, तर दुसऱ्या बाजुला दरीत असलेल्या पेढेतील घरांना धोका आहे. यापूर्वी येथे अपघात झालेले आहेत. गेल्या चार वर्षापासून स्थानिक ग्रामस्थ उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले. परशुराम घाटातील चौपदरकीरणाची बहुतांशी कामे मार्गी लागली आहेत. ठिकठिकाणी संरक्षक भिंती उभारल्या. पावसाळ्यात येथे दरडी कोसळण्याचा धोका कायम आहे. पावसाळा सुरू होत असताना नेहमीप्रमाणे तहसील कार्यालयाने परशुराम येथील २२ ग्रामस्थांना स्थलांतराची नोटीस दिली. महामार्गाचे काम सुरु झाल्यापासून ग्रामस्थांच्या संरक्षणासाठी कोणतीही उपाययोजना झाल्या नाहीत. केवळ नोटीस देऊन शासन आपली जबाबदारी झटकत असल्याने संतप्त झालेल्या काही नागरिकांनी बजावलेल्या नोटीसा स्वीकारलेल्या नाहीत.
---------------
जायचं कोठे?

हा भाग डोंगरालगत असून या भागात दरड कोसळून जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता आहे. तसा भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था यांनी केलेल्या सर्वेक्षणानंतर अतिवृष्टी काळात सबंधित गावाचे तात्पुरते स्वरूपात स्थलांतर करण्याच्या सूचना यापुर्वीच दिल्या आहेत. हवामान खात्याकडून अलर्ट संदेश मिळाल्यानंतर कुटुंबासह त्वरित सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे, असे नोटीसीत म्हटले आले. मात्र पावसाळ्याच्या स्थितीत आम्ही नेमके स्थलांतरीत व्हायचे कुणीकडे याचा उल्लेख नसल्याचे ग्रामस्थांतून सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com