मॉन्सूनचे वेळापत्रक सतत बदलते

मॉन्सूनचे वेळापत्रक सतत बदलते

मॉन्सूनचे वेळापत्रक सतत बदलते

कोकणातील स्थिती ः खरीप हंगामातील भातशेतीवर होणार परिणाम

तुषार सावंत ः सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ७ ः मागील पाच-दहा वर्षांमध्ये जागतिक तापमान वाढीचा परिणाम मॉन्सूनच्या आगमनावर थेटपणे पडू लागला आहे. यंदा मॉन्सून मृगाच्या मुहूर्ताआधी आला असला तरी त्याच्या आगमनाचे वेळापत्रक तुलनेत विस्कळीतच आहे. मॉन्सून आणि मृग नक्षत्र यांचे पारंपरिक संबंध संपुष्टात येत असल्याचे संकेत गेल्या पाच वर्षांत मिळू लागले आहेत. यातच मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात ४० अंश पार तापमान वाढल्याने त्याचे दूरगामी परिणाम आता निसर्गसंपन्न कोकणलाही भोगावे लागणार आहेत.
कोकणातील भातशेती हे प्रमुख पिक आहे. पावसाळी हंगामातील पिकावर स्थानिक शेतकरी आपला उदर्निवाह करत असतो. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात भातपेरणी झाली तर १२० ते १४० दिवसानंतर भातकापणी योग्य होते. पण, हे चित्र आता बदलत आहे. पारंपारिक पद्धतीने खरीप हंगामातील भात शेती हा कोकणातील आर्थिक उत्पन्नाचा कणा मानला जात होता. अलीकडच्या कालावधीत फळबागायतीने जोर धरला. पण, शेती, शेतीपूरक व्यवसाय आणि मासेमारी ही कोकणवासीयांची ओळख आहेच. गेल्या दशकापासून ही ओळख हळूहळू संपुष्टात येऊ लागली आहे. याचे कारण मानव आणि निसर्गाचे नाते तुटू लागले आहे. गेल्या चार-पाच वर्षांत उन्हाळी तापमानही कमालीचे वाढले आहे. याला जागतिक तापमान वाढीचा परिणाम म्हणून पाहिले जाते. पण, याचे आता दुष्परिणामही सोसावे लागत आहेत. चक्रीवादळामुळे पावसाच्या आगमनावर परिणाम होत आहे. समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या नैऋत्य मान्सूनवर याचा परिणाम होऊ लागला आहे. हे अलीकडे सातत्याने होत आहे. आता याचे दुष्परिणाम जाणू लागले आहे. साधारण २०२१ मध्ये ९ जूनला मान्सून दाखल झाला होता. मात्र, २०१९, २०२०, २०२२ आणि २०२३ या वर्षात मान्सूनने आपले नेहमीचे वेळापत्रक बदलण्याचे पाहायला मिळाले. यंदाही हीच परिस्थिती उद्भवलेली आहे.
तांत्रिकदृष्ट्या शनिवारी (ता.६) मॉन्सून दाखल झाला. मात्र, पावसाला हवा तसा जोर अजून नाही. वाढता उष्मा, चक्रीवादळे आणि निसर्गाचे बदललेले संतुलन हीच त्याची महत्त्वाची कारणे आहेत. निसर्ग संपन्न कोकण या दुष्टचक्रात आता अडकू लागले आहे. पूर्वी वैशाख महिन्यात वळवाचा पाऊस कोसळत असायचा. त्यानंतर ज्येष्ठ महिन्यात पावसाची हजेरी लागल्यानंतर नियमित मान्सून हा मृग नक्षत्रापासून हजेरी लावायचा. मात्र, हे चित्र अलीकडच्या कालावधीत पूर्णतः बदलून गेले आहे. यामुळे शेतीच्या खरीप हंगामाबरोबर रब्बी हंगामावर ही आता परिणाम जाणू लागला आहे. पाणीटंचाई तर नित्याचीच झालेली आहे. मानव जातीला पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीसाठी लागणारे नैसर्गिक पाणी आणि त्याचे साठे संपुष्टात येण्याच्या दिशेने वाटचाल करू लागले आहेत. आता सर्वसामान्य जनतेला जबाबदारीने पावले टाकावी लागणार आहेत. अतिरिक्त प्लास्टिकचा वापर, वाढलेल्या वाहनातून होणारे कार्बनचे उत्सर्जन, अतिरिक्त पाण्याचा वापर ही प्रमुख कारणे आता ठळक दिसू लागली आहेत.
यंदा १६ मेस जिल्ह्यातील काही भागात वादळ झाले. या चक्रीवादळात अनेकांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर मे महिन्यात काहीकाळा मान्सूनपुर्व पाऊस झाला. पण, जूनच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही.
----
कोट
जिल्ह्यातील प्रमुख भातशेती पिकामध्ये पारंपारीक बियाणे राहीलेली नाहीत. शेतकरी हा सुधारीत आणि संकरीत बियाण्याकडे वळला आहे. अधिक उत्पन्न देणारी पिके घेतली जातात. पण, पावसाचे वेळापत्रक बदलल्याने शेतकऱ्यांना नुकसान होत आहे. पावसाचे हे होणारे बदल शेतकऱ्यांनी समजून घेतले पाहीजेत. पारंपारी बियाण्यांची कास सोडता कामा नये आणि शेतीसह शेतीपुरक व्यावसाय स्विकारावा लागेल.
- अनिल पेडणेकर, कृतीशिल शेतकरी, चिंचवली-कणकवली
--------
मॉन्सूनचे आगमन
२०१८ - ८ जून
२०१९ - २२ जून
२०२० - १२ जून
२०२१ - ९ जून
२०२२ - १६ जून
२०२३ - १८ जून
२०२४ - ६ जून

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com