सावंतवाडी रेल्वेस्थानकात १२०० प्रवाशी अडकले

सावंतवाडी रेल्वेस्थानकात १२०० प्रवाशी अडकले

Published on

M96249

सावंतवाडी रेल्वेस्थानकात
१२०० प्रवाशी अडकले
मालपेतील बोगद्यात चिखलः प्रशासनाकडून २१ बसेसची व्यवस्था
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १०ः पेडणे-मालपे (गोवा) येथील बोगद्यात पुन्हा रूळावर पाणी आल्याने मडगाव दिशेने जाणाऱ्या मत्स्यगंधा व कोकणकन्या एक्स्प्रेसला सावंतवाडी रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. प्रशासनाकडून सावंतवाडी रेल्वे स्थानकात अडकलेल्या सुमारे १२०० प्रवाशांची २१ बस फेऱ्यांच्या माध्यमातून गोव्यात जाण्यासाठी सोय करण्यात आली.
कोकण रेल्वे मार्गावर पेडणे मालपे बोगद्यामध्ये भूगर्भातून पाणी येऊ लागल्याने रेल्वे रुळावर चिखल आणि पाणी साठले होते. काल (ता. ९) सायंकाळी पावणे चार वाजता हा रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. त्यावेळी गोव्यात जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर मुंबईकडे जाणाऱ्या गोवा राज्यात सर्व रेल्वेगाड्या थांबविण्यात आल्या. युध्दपातळीवर काम झाल्यावर रेल्वे मार्ग मोकळा झाला. त्यानंतर रात्री थांबलेल्या सर्व रेल्वे गाड्या मुंबई आणि मडगावच्या दिशेने गेल्या. मात्र, पुन्हा मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास बोगद्यात चिखल आणि पाणी साचले. त्यामुळे पुन्हा रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला.
या दरम्यान काही गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्या इतर मार्गावरून वळवण्यात आल्या. यामुळे आज मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना सावंतवाडी स्थानकावर उतरविण्यात आले. एकूण बाराशे प्रवाशांना सावंतवाडीत उतरण्यात आले. त्यांना गोवा राज्यात सोडण्यासाठी एसटी बसच्या माध्यमातून सोय करण्यात आली. छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणारी कोकणकन्या एक्सप्रेस सावंतवाडी रेल्वे स्थानकावरून सायंकाळी सुटणार असल्याने मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे. दुसरीकडे मडगाव आणि गोव्याच्या अन्य स्थानकावर आरक्षण केलेल्या प्रवाशांना सावंतवाडी रेल्वे स्थानकावर आणण्यासाठी काही बसेसची सोय सायंकाळी केली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सावंतवाडीत अडकलेल्या प्रवाशांना नेण्यासाठी गोवा राज्यातील कदंबा बसेस खास करून दाखल झाल्या. मात्र, प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली तर रेल्वे प्रशासनाची तारांबळ उडाली व हतबलता पहायला मिळाली.

चौकट
रेल्वे प्रवासी संघटना पदाधिकाऱ्यांकडून मदत
जर सावंतवाडी रेल्वे टर्मिनस झाले असते तर काही प्रमाणात प्रवाशांची सोय झाली असती असे रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव मिहीर मठकर म्हणाले. संघटनेचे मिहीर मठकर, सुभाष शिरसाठ, भूषण बांदिवडेकर, विहंग गोठसकर तसेच अनेक मान्यवरांनी प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानकावर धाव घेतली मदत केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.