शेतकऱ्यांप्रमाणे उद्योजकांवर वेळ येऊ नये
- rat८p१७.jpg-
२५N७६१७५
रत्नागिरी : वीज दरवाढीविरोधात व्यावसायिकांच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांना निवेदन देण्यात आले.
चुकीच्या पद्धतीची वीज दरवाढ थांबवा
रमेश कीर ः जिल्ह्यातील व्यावसायिक एकवटले, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ : राज्यातील शेतकऱ्यांवर काय वेळ आली आहे हे सर्वांना माहिती आहेच; मात्र तशीच स्थिती हॉटेल व्यावसायिक व उद्योजकांवर येते की काय, असे वाढीव वीजबिलांमुळे दिसू लागले आहे. वीज नियामक आयोग घरगुती, उद्योजकांच्या वीजबिलाबाबत नवीन प्रयोग करत आहे. त्याला आमचा ठाम विरोध आहे. कोकणातील पर्यटन फक्त कागदावर दिसत असून, प्रत्यक्षात ते खूप कमी आहे. वाढलेल्या वीजबिलांमुळे हॉटेल्स बंद करण्याची वेळ येऊ शकते. व्यावसायिकांना शॉक बसला आहे. चुकीच्या पद्धतीने होणारी ही दरवाढ थांबवावी, असे रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर यांनी सांगितले.
वाढीव वीजबिलांबाबत जिल्ह्यातील व्यावसायिक, उद्योजक, व्यापारी, हॉटेल असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर रमेश कीर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या प्रसंगी कीर म्हणाले, सरकारला महाराष्ट्रात उद्योग टिकवायचे आहेत की जगवायचे आहेत, हा प्रश्न मला पडला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात हॉटेल उद्योगाला व्यावसायिक दर्जा दिलेला नाही. आम्ही तुम्हाला उद्योगाचा दर्जा देतो, असे सांगितले; पण आजही महावितरणची बिले उद्योग व्यावसायिक दरानेच येत आहेत. हा अधिकचा भार पडतोय. याबद्दल शासन कुठेही गंभीर नाहीये. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, मी वीजदर कमी केले; पण पुढील टप्प्यावरील दरवाढ बघून त्या ग्राहकांना फासावर चढवल्यासारखे दिसत आहे. याची गंभीर दखल शासनाने घ्यावी आणि या आयोगाशी चर्चा करावी, असे कीर यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना अ. भा. अक्षय ऊर्जा संघटनेचे जिल्हा संचालक ऋषिकेश कोंडेकर, वसीम नाईक, जिल्हा चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीजचे केशव भट, लघुउद्योग असोसिएशनचे दिगंबर मगदूम, शहर व्यापारी महासंघाचे सचिव धनेश रायकर, उत्तर रत्नागिरी उद्योग असोसिएशनचे अनिल त्यागी, लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनचे राज आंब्रे, दापोली औद्योगिक क्षेत्र उद्योजक असोसिएशनचे अरुण नरवणकर उपस्थित होते.
कोट १
रत्नागिरी जिल्ह्यात हंगामी एच. टी. ग्राहक हे प्रामुख्याने फळप्रक्रिया उद्योगात असतात. त्यांचे उत्पादन आता बंद असल्याने त्यांना पुढील हंगामात त्यांचा हंगामी वीजवापर सुरू झाल्यावरच ही दरवाढ ३३.६१ टक्केने लागू झाल्याचे समजेल. शासनाने दिलासा देताना एमईआरसीचा २५ जून २०२५ चा आदेश रद्द करावा आणि २८ मार्च २०२५ चा आदेश पुन्हा लागू करावा.
- केशव भट, सरचिटणीस, फेडरेशन ऑफ रत्नागिरी जिल्हा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज
कोट २
वीज नियामक आयोगाने आलेली दरवाढ भरपूर आहे. याचा घरगुती व व्यावसायिक या सर्वच ग्राहकांना मोठा धक्का बसणार आहे. त्यामुळे संघटनेतर्फे शासनाच्या या धोरणाचा निषेध नोंदवण्यासाठी आज राज्यात काळा दिवस पाळत आहोत. आज कामकाज पूर्ण थांबवले आहे. न्यायालयात दाद मागितली असून, १४ जुलैपर्यंत आदेशाला स्थगिती आली आहे.
- वसीम नाईक, अ. भा. अक्षय ऊर्जा संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.