मुंबईत आणि शेतीत कोणी उपाशी मरत नाही

मुंबईत आणि शेतीत कोणी उपाशी मरत नाही
Published on

बोल बळीराजाचे ................लोगो
(२६ जुलै टुडे ३)

कोकणातील शेती, बागायती, पशुपालन, मासेमारी हे सारे ‘शेती’ या सदरातच गणले जातात. त्यातही आता कृषी पर्यटन, शेतीची उपउत्पादने, शेतीपूरक व्यवसाय हेही शेती म्हणूनच मानायला हवे. खरंतर, हे सर्व एकाच कुटुंबातील असल्याने एकमेकांवरचे अवलंबित्व हे सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक आहे. शेतीमध्ये रोजगाराच्या अनंत संधी आहेत, असे आपण म्हणतो ते फक्त प्रत्यक्ष मातीत काम करण्यापुरत्या मर्यादित अर्थाने नाहीच..‘एकमेकां साह्य करू अवघे...’ सारखेच आहे. कसे ते पाहूया.....

- rat१p४.jpg-
OP25N81400
- जयंत फडके, जांभूळआड पूर्णगड, रत्नागिरी
----
मुंबईत आणि शेतीत
कोणी उपाशी मरत नाही

शेती, बागायती आहेत म्हणून गवत, पालापाचोळा (बायोमास) आहे. या बागांमधील गवत, टाळटुळ गुरे खात आहेत म्हणून बागा साफ, स्वच्छ आहेत. बाकी बायोमास गांडूळखत, कंपोस्ट खतासाठी इंधन म्हणून उपयुक्त आहे. गुरापासून दूध बाजूला राहूद्या. शेण, गोमूत्र उत्तम खत आहे. गांडूळखत करण्यासाठी जीवामृत, गोबरगॅस, शेणी यासाठी उपयुक्त आहे. गोबरगॅसमधील स्लरीखत, गांडूळखत यासाठी उत्तम आहे. तयार होणारे खत परत शेती बागायतीसाठी उपयोगी आहे. शेती परवडत नाही, बागा साफ करायला परवडत नाही, गवत काढणे परवडत नाही, गुरे कोकणात बिल्कुल परवडत नाहीत, गांडूळखत महाग पडते, गॅस परवडत नाही, शेण परवडत नाही, झाडांना शेतीला आपणच तयार केलेले विश्वासार्ह खत परवडत नाही, गाईचे दूध परवडत नाही-दुधाची पिशवी परवडते, भात-दाढ-चिखल-लावणी परवडत नाही....बासमती परवडतो....घाटावरची मळी, माती असलेले खत परवडते..सिलिंडर परवडतो; पण स्वयंपूर्ण गोबर बायोगॅस परवडत नाही...एकूणच काय शेतकरी होणेच परवडत नाही..म्हणूनच हेच खरे की, शेती हा व्यवसाय नाही तर जीवनपद्धती आहे..शाश्वत, स्वयंपूर्ण जीवनपद्धती..!!
जेव्हा आपण एखादी गोष्ट मनापासून स्वीकारतो तेव्हा उणिवांचे रूपांतर संधीत होते. शेतीच्या प्रत्येक क्षेत्रात अशा अनंत संधी आहेत. मनुष्यबळाचा त्याच्या शारीरिक, शैक्षणिक, बौद्धिक कुवतीनुसार वापर करता येतो. मुंबईत आणि शेतीत कोणी उपाशी मरत नाही. फक्त अंगचोरपणा टाकून काम करायची तयारी हवी. कोणत्याही वयोगटातील माणसाला, प्राण्याला इथे काम आहे. कामाला मोल आहे. फक्त चुकीच्या धोरणांनी आपण श्रमाला प्रतिष्ठा नाकारली आहे. शेतकरी खरंतर, साऱ्या समाजव्यवस्थेचा, अर्थव्यवस्थेचा कणा....; पण शिक्षणव्यवस्थेत, समाजरचनेत सगळ्यात डावलला जातो तो शेतकरीच! मग ‘परवडत’ नाही हे पालूपद या श्रमप्रतिष्ठेला कधी अलगद जोडलं गेलं हे सुशिक्षित शेतकऱ्याच्या पुढच्या पिढीलाही समजलं नाही.
जीवनचक्र खरेच सोपे नाही. जोपर्यंत आपण त्यात आनंद शोधत नाही. कॅल्क्युलेटर घेऊन आकडेमोड करून आयुष्य संपले तरी आपण काय कमावले याचा ताळेबंद लागत नाही मग परवडायचे गणित कोणी कोणाला सांगावे? प्लास्टिकचे तांदूळ, रासायनिक विष प्यालेला भाजीपाला, गाई-म्हशीशी संबंध नसलेले दूध, संकरित धान्य, बडपासून फळ पिकेपर्यंत रासायनिक बुडालेली फळे...हे सारे समोर दिसत असूनही आपण शेती, बागायती, गाई इ. परवडत नाही असेच म्हणायचे का? हे नक्कीच यातले एकच एक वेगळे करून गणित मांडायला गेले आणि दोन-चार वर्षांतच ‘पॅकेज’चे नियम शेतीला लावले तर कठीण आहे. शेतीत कधी दोन अधिक दोन चार, कधी तीन तर कधी सहाही होते.. हो हो अगदी शून्यही होते.. हे गणितच तसे आहे. म्हणूनच शून्य ते नऊच्या बेरीज-वजाबाकीत शेतीला तोलूच नये. जरूर लाखाचे बारा हजार होणार नाहीत ना हे पाहावे; पण हे काही शेअरमार्केट नाही.. हा जीवंत निसर्गाचा व्यवहार आहे. जीवनप्रवाही आहे. एका सरीचे रूपांतर पऱ्यात कधी होईल त्या थेंबालाही माहीत नाही.. मग तो घामचा असो, अश्रूंचा असो की, मृगाचा...!!

(लेखक प्रगतीशील आणि प्रयोगशील शेतकरी आहेत.)

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com