कणकवली तालुक्यातील रस्ते १५ ऑगस्टपर्यंत सुसज्ज ठेवा
कणकवली तालुक्यातील रस्ते
१५ ऑगस्टपर्यंत सुसज्ज ठेवा
प्रांताधिकारी जगदीश कातकर यांची सूचना
कणकवली, ता. १० : पावसामुळे तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाने तालुक्यातील सर्व रस्त्यांची वाहतूक सुरळीत राहील, असे नियोजन १५ ऑगस्टपर्यंत करावे, अशी सूचना प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी केली आहे.
येथील तहसील कार्यालयात आगामी गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी शांतता समितीची बैठक प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी तहसीलदार दीक्षांत देशपांडे, निवासी नायब तहसीलदार मंगेश यादव, पोलिस निरीक्षक अतुला जाधव यांच्या सहा विविध विभागांचे अधिकारी आणि प्रभारी कर्मचारी उपस्थित होते.
नियोजनाची सूचना देताना श्री. कातकर म्हणाले, रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपंचायत यांनी नियोजन करावे. येत्या १५ तारखेच्या आत सर्व ग्रामीण आणि शहरी भागातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात यावेत. या कालावाधीत कोकणात मोठ्या प्रमाणात वाहतूक होणार आहे. मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर खड्डे आहेत. शहरातील सव्हिस रस्त्यावर खड्डे आहेत. यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी आहे. गणेशोत्सवाच्या काळात रस्त्यांवरील विजेची व्यवस्था करण्यासंदर्भात तसेच सणांच्या कालावधीत भारनियमन अथवा विद्युत पुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना महावितरणला देण्यात आल्या.
आरोग्यविषयक पथके रेल्वे स्टेशने, बसस्थानक येथे तैनात करावीत, पहिल्या तीन दिवसांकरिता पथके तैनात केली जातात; परंतु गणेशोत्सव पूर्ण होईपर्यंत ही पथके करता येतील का? या दृष्टीने आरोग्य विभागाने नियोजन करावे, अशाही सूचना देण्यात आल्या. एसटी महामंडळाच्या कणकवली बसस्थानकावरून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या बसेसविषयी आढावा घेण्यात आला.
शहरांमध्ये दुचाकी, चारचाकी गाड्या पार्किंगबाबत नियोजन करावे, त्या अनुषंगाने प्रसिद्धीसाठी माहिती द्यावी, अशा सूचना नगरपंचायतीला देण्यात आल्या. वाहन पार्किंगबाबतचे बोर्ड करून त्याचे तातडीने नियोजन करावे, अशा सूचना नगरपंचायत व पोलिस विभागाला देण्यात आल्या.