रत्नागिरी ः जयगड बंदराचा ''हब'' म्हणून विकास करणार

रत्नागिरी ः जयगड बंदराचा ''हब'' म्हणून विकास करणार

Published on

-rat11p27.jpg
90882
रत्नागिरी ः जेएसडब्ल्यू पोर्ट कंपनीच्या अधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना मत्स्य व्यवसाय आणि बंदरविकासमंत्री नीतेश आदी.

जयगड बंदर बनेल कोकणचे निर्यात ‘हब’

मंत्री नीतेश राणे : आंबा, काजू मत्स्यनिर्यातीसाठी एक सक्षम पर्याय उभारणार

दृष्टिक्षेपात
* कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गामुळे उर्वरित महाराष्ट्र कोकणाशी जोडेल
* कोकणवासीयांच्या दरडोई उत्पन्नात वाढ होईल
* जयगड बंदर येथे राणे यांनी घेतली महत्त्वपूर्ण बैठक

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : कोकणातील अर्थव्यवस्था आणि विकासाला चालना देण्यासाठी जयगड बंदराला एक महत्त्वाचे केंद्र (हब) म्हणून विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी उर्वरित महाराष्ट्राला जोडणाऱ्या कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाचीही जोड असेल. त्यामुळे कोकण विकासाला चालना मिळून कोकणवासीयांच्या दरडोई उत्पन्नात वाढ होईल, असे प्रतिपादन राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरविकासमंत्री नीतेश राणे यांनी केले.
जयगड बंदर येथे राणे यांनी जेएसडब्ल्यू पोर्ट कंपनीचे अधिकारी यांच्यासह मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी, मत्स्य व्यवसाय, बंदर विभाग, कृषी, अपेडा, मित्रा या संस्थांचे प्रतिनिधी, कोकणरेल्वे यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची अत्यंत महत्त्वाची बैठक जयगड येथे घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘केंद्र आणि राज्यसरकारच्या सहकार्याने जयगड बंदराचा विकास कसा करता येईल यावर सखोल चर्चा झाली. जयगड बंदराचा वापर आंबा, काजू आणि मत्स्य उत्पादनांच्या निर्यातीसाठी एक सक्षम केंद्र म्हणून करणे हे आहे. सध्या या उत्पादनांची निर्यात मुख्यतः उरण येथील जेएनपीटी बंदरातून होते; मात्र त्यामुळे वाहतूकखर्च आणि लॉजिस्टिक मोठ्या प्रमाणात वाढतो. या खर्चाला आळा घालण्यासाठी आणि स्थानिक उत्पादकांना फायदा होण्यासाठी जयगड बंदराला जेएनपीटीला एक सक्षम पर्याय म्हणून विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने हे बंदर अधिक सक्षम करण्यासाठी या बैठकीत बंदराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या सवलती आणि मदतीबाबतही चर्चा झाली आहे.’
रेल्वेमार्गासाठी सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. हा रेल्वेमार्ग सुरू झाल्यास कोकणचा विकास अधिक वेगाने होईल आणि जयगड बंदराला त्याचा मोठा फायदा होईल. त्यामुळे त्याचा पाठपुरावा केला जाईल. केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेल्या निर्णयांचा पाठपुरावा करण्यात येईल. या बैठकीचा उद्देश केवळ बंदराचा विकास नसून, परिसरातील शेतकरी आणि नागरिकांचे जीवनमान व आर्थिक क्षमता उंचावणे हा होता, असेही मंत्री नीतेश राणे यांनी सांगितले.
----------------
चौकट
तालुके जलमार्गाने जोडण्यासाठी प्रस्ताव
उत्पादनांची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी कोल्डस्टोरेजची क्षमता वाढवण्यावर आणि वाहतुकीचे अंतर कमी करण्यावरही चर्चा झाली. याशिवाय, विविध तालुके जलमार्गाने कसे जोडले जातील, याचा प्रस्ताव महाराष्ट्र सागरी मंडळ (एमएमबी) तयार करत आहे. जेएसडब्ल्यू ही देशातील एक मोठी आणि महत्त्वाची कंपनी असून, त्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. या सर्व प्रयत्नांमुळे कोकणातील व्यवसाय आणि व्यापाराला चालना मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल घडतील, असेही राणे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com