नारळ-सुपारी फळगळीचे पंचनामे करा
91046
नारळ-सुपारी फळगळीचे पंचनामे करा
बांद्यातील शेतकऱ्यांची मागणी; जिल्हा कृषी उपसंचालकांकडे मांडल्या समस्या
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १२ ः यंदा झालेल्या अतिवृष्टी व अति ओलाव्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारळ व सुपारीच्या बागांमध्ये प्रचंड फळगळ झाली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्याने झाडांकडून पोषणद्रव्ये शोषली जात नाहीत आणि त्यामुळे हा प्रकार घडल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले. या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करून तातडीने भरपाईचा अहवाल शासनाकडे पाठवावा, या मागणीसह इतर अनेक प्रश्नांसाठी बांदा दशक्रोशीतील शेतकऱ्यांनी भाजप बांदा मंडल उपाध्यक्ष गुरु कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कृषी उपसंचालक ज्ञानेश्वर बढे यांची भेट घेतली.
यावेळी शेतकऱ्यांनी घाटमाथा व कोकणातील हवामान, जमीन व शेतीच्या क्षेत्रामध्ये प्रचंड तफावत असल्याचे निदर्शनास आणून दिले. कोकणातील आंबा, काजू, कोकम, नारळ व सुपारी यांसारख्या फळपिकांसाठी स्वतंत्र अनुरूप विकास आराखडा तयार करावा, अशी मागणी केली. तसेच कोकणातील शेतीपूरक अवजारे अद्याप अनुदानाखाली समाविष्ट नसल्याने ती उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणीही करण्यात आली. भेडल्या माडांची पाने चोरून नेल्यामुळे राज्यप्राणी शेकरूच्या निवासस्थानी बाधा निर्माण होत असून त्यामुळे नारळ बागायतींचे मोठे नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तसेच शेततळ्यांच्या प्लास्टिक आवरणाचा दर्जा किमान ५०० मायक्रोन ठेवावा, अशी मागणी देखील यावेळी झाली.
उपसंचालक बढे यांनी शेतकऱ्यांशी सकारात्मक चर्चा करत त्यांची सर्व मागणी मान्य करण्याचे आश्वासन दिले. कोकण विभागासाठी स्वतंत्र कृषी आराखडा लवकरच तयार करण्यात येणार असून शेतकऱ्यांनी सुचवलेली अवजारे अनुदानाखाली आणली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत प्रत्यक्ष पाहणी करून येत्या आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात येतील. शेततळ्याच्या प्लास्टिक आवरणाबाबत ५०० मायक्रोनचा दर्जा निश्चित करण्यात येईल. भेडल्या माड व शेकरू समस्येबाबत वनविभागाला सूचित केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. या भेटीप्रसंगी भाजप बांदा मंडल उपाध्यक्ष गुरु कल्याणकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे, जयेश कृष्णा सावंत, शरद भीमसेन सावंत, चंद्रकांत अनंत भिसे, आनंद विठ्ठल वसकर, दिनेश वामन देसाई, राजेंद्र सूर्यकांत सावंत, नारायण वामन प्रभू शिरोडकर, सौरभ सुभाष सिद्धये, डॅनी अल्मेडा आदी उपस्थित होते.
--------------
पालकमंत्र्यांचे लक्ष वेधणार
भविष्यात नारळ व सुपारी ही फळपिके हवामानावर आधारित विमा संरक्षणाखाली आणण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नांसाठी पालकमंत्री नीतेश राणे यांना निवेदनाद्वारे विनंती करण्यात येणार असल्याचे श्री. कल्याणकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.