ज्ञानेश्वरीतून पर्यावरण रक्षणाची प्रेरणा

ज्ञानेश्वरीतून पर्यावरण रक्षणाची प्रेरणा

Published on

91470

ज्ञानेश्वरीतून पर्यावरण रक्षणाची प्रेरणा

अॅड. उमेश सावंत ः कनेडी प्रशाळेत ‘एक पेड माँ के नाम’

सकाळ वृत्तसेवा
कणकवली,ता. १४ ः पृथ्वीचा समतोल बिघडत आहे. मात्र, याचे ज्ञान आपल्याला प्राचीन ग्रंथातूनच मिळाले आहे. वृक्षांची महती ही प्राचीन काळापासून ज्ञानेश्वरीच्या पाचव्या अध्यायात स्पष्ट करण्यात आली आहे. म्हणूनच पर्यावरण वाचवण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची आहे, असे प्रतिपादन कायदेतज्ज्ञ अॅड. उमेश सावंत यांनी केले.
कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत मंडळाचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्‍घाटन अॅड. श्री. सावंत यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष सतीश सावंत, चेअरमन आर. एच. सावंत, खजिनदार गणपत सावंत, सदस्य तुषार सावंत, संतोष सावंत, पर्यवेक्षक बयाजी बुराण आदी उपस्थित होते.
अॅड. सावंत म्हणाले, ‘‘ज्ञानेश्वरांनी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ असे म्हटले आहे. म्हणजेच वृक्षाला आपलेसे केले आहे. वृक्षांना सोयरे म्हटले आहे. हा विचार आपण समजून घेतला पाहिजे. पृथ्वीचा समतोल बिघडत चालला आहे. मात्र, याचे ज्ञान आपल्याला प्राचीन ग्रंथातूनच मिळाले आहे. ही ग्रंथ संपदा आणि त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आजच्या पिढीने प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे. सतीश सावंत यांच्या माध्यमातून आपल्याला दिलेले एक झाड म्हणजे ‘एक पेड अपने माँ के नाम’ म्हणजेच आपण एका वृक्षाचे जतन करणार आहोत. ते म्हणजे आपल्या आईच्या विचारांचे जतन करणार आहोत. हे लक्षात ठेवलं पाहिजे. राज्य शासन दरवर्षी ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ अशी योजना राबवते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक पेड माँ के नाम’ हा उपक्रम देशभर सुरू केला. या उपक्रमातून देशभरात दहा कोटी वृक्ष लागवड होणार आहे. राज्यात एक कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. शासनाच्या पंचविस विभागाने हे उद्दिष्ट वाटून दिले आहे. हा उपक्रम आपल्या शाळेने सुरू केला हे अभिमानास्पद आहे. खरतर ३३ टक्के क्षेत्र हे वृक्षलागवडीचे असावे. पण, राज्यात केवळ २७ टक्के वनक्षेत्र आहे. राज्याला जागतिक बँकेने काही अटी घातल्या आहेत. त्यात वृक्ष लागवड ही एक अट आहे.’’ संस्थेचे चेअरमन आर.एच. सावंत यांनी प्रास्ताविक केले. प्रसाद मसुरकर यांनी सूत्रसंचालन केले.
-------
निसर्गावर प्रेम करा, निसर्ग समजून घ्या!
सतीश सावंत म्हणाले, ‘‘कनेडी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात. मात्र, आजचा उपक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. पर्यावरण रक्षणाची जबाबदारी आपली आहे. भविष्यातील पिढीचे रक्षण करणारा हा निसर्ग आहे. तो निसर्ग आपण जोपासला पाहिजे. प्रत्येकाने आपल्या आईप्रमाणे या रोपांना जपावे, एक वृक्ष आपणासाठी खूप काही देऊन जाणार आहे. खऱ्या अर्थाने या वृक्षांमध्ये आपली आईच दडलेली असते. पर्यावरण रक्षण करताना आधुनिक जीवनशैलीपासून दूर राहा. प्लास्टिकचा वापर करू नका. निसर्गावर प्रेम करा, निसर्ग समजून घ्या.’’

Marathi News Esakal
www.esakal.com