श्री रेणुका देवीची आराधना
संतांचे संगती (नवरात्र विशेष) - लोगो
rat17p3.jpg-
92080
धनंजय चितळे
इंट्रो
कोकणभूमी निर्माता भगवान श्री परशुरामांची आई म्हणजे श्री रेणुकामाता ही सर्व ६४ योगिनींमध्ये श्रेष्ठ आहे, असा उल्लेख नवरात्रीच्या आरतीमध्ये आला आहे.
------
श्री रेणुका देवीची आराधना
द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनी हो।
सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो।
पूर्णकृपे तारिसी जगन्माते मनमोहिनी हो।
भक्तांच्या माऊली सूर ते येती लोटांगणी हो।। असा उल्लेख आरतीमध्ये आला आहे. श्री दत्तमाहात्म्य ग्रंथामध्ये प. प. श्री. वासुदेवानंद सरस्वती टेंब्येस्वामी महाराजांनी या देवीच्या अवताराची कथा वर्णन केली आहे. ही रेणुराजाची कन्या आहे. जमदग्नी ऋषींची ती पत्नी आहे. परशुरामांसारख्या महावीराला जन्म दिला म्हणून तिला एकवीरा असे नाव आहे. साऱ्या विश्वाची माता असल्याने तिला यल्लम्मा असेही म्हणतात. कुंकणा या तिच्या नावावरूनच आपल्या क्षेत्राला कोकण हे नाव पडले आहे. एकदा श्री ब्रह्मदेवांना वेदांचे विस्मरण झाले तेव्हा त्यांनी श्री रेणुका देवीची आराधना केली आणि त्यांना वेदनांचे पुन्हा स्मरण झाले, असा कथाभाग पुराणांमध्ये वाचायला मिळतो म्हणूनच या देवीला वेदजननी असेही म्हणतात. माहुरगडावर तिचे मुख्य स्थान आहे. सातारा भागातील एका भक्ताने तिथे राहून देवीची उपासना केली. रोज सकाळी लवकर उठून स्नानसंध्या आटोपून श्री रेणुकेचे दर्शन घ्यावे नंतर संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालावी. मग परत देवीदर्शन करून नंतरच अन्नपाणी घ्यावे, असा त्यांचा दिनक्रम होता. एकदा उन्हाळ्यात प्रदक्षिणा घालताना त्यांना चक्कर आली म्हणून ते एका झाडाखाली बसले. थोड्या वेळाने डोक्यावर टोपलं घेतलेली एक खेडूत स्त्री तिथे आली. यांनी तिला विचारले,”माय, इकडं काय करते? ती म्हणाली माझं लेकरू अन्नपाणी न घेता फिरतयं त्याला शोधतेय; पण ल्येका, तू पण तसाच, माझ्या लेकासारखाच आहेस. हे पाणी घे, भाकर खा,” त्या भक्ताने, विष्णुदासांनी पाणी प्यायले, थोडी भाकरी खाल्ली आणि त्या बाईकडे बघितले तर ती प्रत्यक्ष श्री रेणुकाच असल्याचे त्यांना दिसले. आपला हा अनुभव त्यांनी एका पदात शब्दबद्ध केला आहे.
माझी रेणुका माउली कल्पवृक्षाची सावली।।ध्रुव।।
आली तापल्या उन्हात, नाही आळस मनात।। १।।
जैसी वत्सालागी गाय तैसी अनाथांची माय।। २।।
खाली बैस घे आराम, मुखावरती आला घाम।। ३।।
विष्णुदास आदराने, वारा घाली पदराने ।। ४।।
वाचकहो, उषा मंगेशकर यांनी गायलेली ही रचना आपण अनेकदा ऐकली असेल; पण त्या रचनेची कथा आपल्याला माहीत नसते.. आता गोष्ट कळल्यावर हे पद परत एका पाहा किती आनंद मिळतो ते !
(लेखक संत आणि संस्कृतीचे अभ्यासक आहेत.)