-कोमसापचे वार्षिक वाड्मयीन पुरस्कार जाहीर
‘कोमसाप’चे वाङ्मयीन पुरस्कार जाहीर
लवकरच वितरण ; ‘अर्धकौरव, चिंबोरे युद्ध’ची निवड
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ : कोकण मराठी साहित्य परिषदेच्यावतीने देण्यात येणाऱ्या वाङ्मयीन व वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. दरवर्षी संबंधितांकडून प्रस्ताव मागितले जातात. त्यानुसार प्रस्तावाची परीक्षकांकडून छाननी झाल्यानंतर हे पुरस्कार जाहीर केले गेले.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या २०२३-२४चे प्रथम आणि द्वितीय पुरस्कार देण्यात आले आहेत. कादंबरी विभागात र. वा. दिघे स्मृती पुरस्कार उदय जोशी यांचा अर्धकौरव, वि. वा. हडप स्मृती पुरस्कार बाळासाहेब लबडे लिखित चिंबोरे युद्धला मिळाला. कथा विभागात वि. सी. गुर्जर स्मृती पुरस्कार शशिकांत काळे यांच्या कालयंत्रला तर विद्याधर भागवत स्मृती पुरस्कार वीणा रारावीकर यांच्या गुजगोष्टीला दिला आहे. कविता विभागात आरती प्रभू स्मृती पुरस्कार गीतेश शिंदे यांच्या सीसीटीव्हीच्या गर्द छायेत तर वसंत सावंत स्मृती पुरस्कार मानसी चाफेकर यांच्या हळूवार मनाची आई कवितासंग्रहाला. आत्मचरित्र विभागात धनंजय कीर स्मृती पुरस्कार अरुण घाडीगावकर यांच्या भक्तीपंथेची जावे या संग्रहाला, चरित्र विभागात श्रीकांत शेट्ये स्मृती पुरस्कार डॉ. राजू शनवार यांच्या पोश्यांपार या चरित्राला देण्यात आला आहे. समीक्षा विभागात प्रभाकर पाध्ये स्मृती पुरस्कार रोहिदास पोटे यांच्या गझल गंधाक्षरी या ग्रंथाला, नाटक विभागाचा भाई भगत पुरस्कार प्रकाश चांदे यांच्या तराने अपसाने या नाटकाला तर ललित गद्यविभागातील अनंत काणेकर स्मृती पुरस्कार वैशाली पंडित यांच्या मंत्र भूलला आणि सौ. लक्ष्मीबाई व माजी न्यायमूर्ती राजाभाऊ गवांदे पुरस्कार डॉ. अजित मगदूम यांच्या न घेतलेला रस्ता या साहित्यकृतीला दिला आहे. बालवाङ्मय विभागाचा प्र. श्री. नेरुरकर स्मृती पुरस्कार सदानंद पुंडपाळ यांच्या हिरवी राने, गाती गाणे या ग्रंथाला. संकीर्ण विभागात वि. कृ. नेरुरकर स्मृती पुरस्कार रिचर्ड नुनीस यांच्या वाडवळी शब्दकोष आणि व्युत्पत्ती शोधला तर अरुण आठल्ये स्मृती पुरस्कार जे. डी. पराडकर यांच्या अक्षरयात्रा या ग्रंथास आणि वैचारिक विभागासाठीचा फादर स्टीफन सुवार्ता पुरस्कार ना. वा. रणशिंग यांच्या आदिवासी ते पांढरपेशी या ग्रंथाला मिळाला. एकांकिका विभागात रमेश कीर पुरस्कार डॉ. सुभाष कटकदौंड यांच्या नव्याने जगायचंय मला, या ग्रंथाला मिळाला आहे तर कोमसापच्या संपादन, कथासंग्रह, कादंबरी विभागातील विशेष पुरस्कार अनुक्रमे बीज अंकुरे अंकुरेसाठी सुरेश ठाकूर यांना आणि पटावरच्या सोंगट्यांसाठी विलास गावडे यांना व वाळूचे किल्लेसाठी अविनाश कोल्हे यांना जाहीर झाले आहेत.
यासोबतच वाङ्मयेतर पुरस्कारांमध्ये कविता राजधानी पुरस्कार मालवणचे कोकणी कवी रूजारिओ पिंटो, कोकण साहित्यभूषण डहाणूचे प्रवीण दवणे. पालघर व ठाणे जिल्ह्यासाठीचा कै. पद्मश्री भाऊसाहेब वर्तक प्रतिष्ठान पुरस्कार माजी शिक्षणाधिकारी, साहित्यिक डॉ. जिवबा केळुस्कर यांना दिला. श्री. बा. कारखानीस पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक, लेखक, डॉ. तानाजीराव चोरगेना दिला आहे. गुरुवर्य अ. आ. देसाई कोमसाप कार्यकर्ता पुरस्कार मुंबईच्या बोरिवली शाखेचे जगदीश भोवड यांना, राजा राजवाडे स्मृती वाङ्मयीन कार्यकर्ती पुरस्कार ठाण्याच्या नितल वढावकर, ग्रामीण भागातील स्त्री लेखिकेसाठीचा नमिता कीर लक्षवेधी पुरस्कार रत्नागिरीच्या उज्ज्वला बापट यांना, वामनराव दाते स्मृती उत्कृष्ट कोमसाप शाखा पुरस्कार पालघर शाखेला, सुलोचना मुरारी नार्वेकर स्मृती पुरस्कार लांजाच्या तनुजा प्रभुदेसाई यांना, कवी उमाकांत कीर स्मृती काव्य पुरस्कार मालगुंडचे अरूण मोर्ये यांना आणि कोमसाप युवा कार्यकर्ता पुरस्कार ठाण्याच्या दीपा ठाणेकर यांना जाहीर झाला आहे.
पुरस्कार विजेत्यांचे साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधू मंगेश कर्णिक, कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, कोषाध्यक्ष प्रकाश दळवी, केंद्रीय कार्यवाह दीपा ठाणेकर, केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे यांनी अभिनंदन केले आहे.