ऑपरेशन तारा अंतर्गत सह्याद्रीत येणार २ वाघिणी

ऑपरेशन तारा अंतर्गत सह्याद्रीत येणार २ वाघिणी

Published on

25N94795
ऑपरेशन ‘तारा’ अंतर्गत सह्याद्रीत येणार दोन वाघिणी
उपक्रमातून वाघांचे होणार पुनर्वसन ; जैवविविधतेला मिळणार चालना
मुझफ्फर खान सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २७ : सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात पहिल्या टप्प्यात दोन वाघिणी आणल्या जाणार आहेत. या वाघिणी पेंच व्याघ्रप्रकल्प व ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पातून आणण्यात येणार आहेत. शासनाकडून या मोहिमेला ऑपरेशन ‘तारा’ असे नाव देण्यात आले आहे. ऑपरेशन ‘तारा’ सारख्या शास्त्रीय मार्गदर्शनाखाली राबवलेल्या उपक्रमांमुळे संवर्धनाला नवी ऊर्जा मिळणार आहे, असा विश्वास सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाचे उपसंचालक किरण जगताप यांनी व्यक्त केला आहे.
ताडोबा, अंधारी, पेंच व्याघ्रप्रकल्पातील आठ वाघ सह्याद्रीत आणले जाणार आहेत. मागील पाच वर्षापासून त्याची तयारी सुरू आहे. याबाबत माहिती देताना या व्याघ्रप्रकल्पाचे उपसंचालक जगताप म्हणाले, ऑपरेशन ‘तारा’ या विशेष उपक्रमांतर्गत ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प येथून वाघीण सह्याद्रीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या ऑपरेशनमुळे सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात जैवविविधतेला चालना मिळून वाघांच्या संख्येत शाश्वत वाढ होईल.
पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्रप्रकल्प हा शासनाचा एक महत्वाकांक्षी व्याघ्रप्रकल्प आहे, जो रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये विस्तारलेला आहे. वाघांबरोबर येथील जैवविविधता यांचे रक्षण होणार आहे. पर्यायाने येथील जलस्रोत शाबूत व सुरक्षित राहतील तर जंगले, वन्यजीव वाचणार आहेत. या निर्णयामुळे वन्यजीव संरक्षणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले जात आहे. वाघपुनर्वसनाची संपूर्ण प्रक्रिया मागील पाच वर्षापासून भारतीय वन्यजीव संस्था यांच्या वैज्ञानिक मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
पहिल्या टप्प्यात चांदोली अभयारण्यामध्ये दोन मादी वाघ आणले जाणार आहेत. त्यानंतर उर्वरित सहा वाघ चांदोली आणि कोयना अभयारण्यामध्ये सोडले जातील. प्रथम दोन वाघ आणल्यानंतर त्यांना सह्याद्रीचे हवामान पोषक आहे किंवा नाही याचा प्रथम अभ्यास केला जाईल. त्यासाठी प्राथमिक प्रतिसाद पथक तयार करण्यात आले आहे. इतर ठिकाणचे वाघ सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात आणल्यानंतर त्यांच्या खाद्याची सोय करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी गवताळ प्रदेश तयार करण्यात आला आहे. सह्याद्रीत जागोजागी पाणवठे तयार करण्यात आले आहेत. बंदिवासातील शाकाहारी प्राणी म्हणजेच सांबर, चितळ यांचे पुनर्वसन करून त्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. पायदळ गस्त, कॅमेरा ट्रॅप्स आणि निरीक्षण उच्चपातळीवर सुरू आहे.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com