विमा भरपाई न मिळाल्याने शेतकरी आक्रमक

विमा भरपाई न मिळाल्याने शेतकरी आक्रमक

Published on

95490

विमा भरपाईसाठी कृषी अधीक्षकांना घेराओ

भडगाव मंडळातील शेतकरी आक्रमक; अधिकाऱ्यांकडून मागणीची दखल

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २९ ः आंबा, काजू पिकांच्या नवीन हंगामासाठी पीक विमा उतरविण्याची वेळ आली तरी मागील पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना न मिळाल्याने भडगाव मंडळामधील शेतकऱ्यांनी आज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांना घेराओ घालत जाब विचारला. भरपाईची रक्कम ५ ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल, असे लेखी पत्र कृषी अधीक्षक कार्यालयाने दिले. मात्र, मुदतीत रक्कम न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडू, अशा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
शासनाने जाहीर केलेल्या विमा कंपनीकडून जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदार शेतकऱ्यांनी फळपीक विमा संरक्षण घेतले होते. विमा संरक्षणाची मुदत संपल्यानंतर पुढील ४५ दिवसांत नुकसान भरपाई जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रक्कम अदा करणे, ही कंपनीची जबाबदारी असल्याचे शासनाकडून स्पष्ट केले आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील अनेक काजू व आंबा बागायतदारांनी विमा संरक्षणाचा फायदा घेतला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विमा भरून झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांचे नुकसानही झाले होते. या शेतकऱ्यांना २०२४-२५ मधील फळपीक विम्याची रक्कम अद्याप मिळाली नाही. यासाठी शेतकऱ्यांकडून वारंवार पाठपुरावा केला जात आहे. तरीही शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळालेली नाही. विमा कंपनीकडून समर्पक उत्तर मिळत नाही. आता तर नवीन हंगामासाठी फळ पीक विमा भरण्यास सुरुवात होणार आहे. मागील विम्याची रक्कम शेतकऱ्यांना न मिळाल्याने हे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे आज जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदार शेतकऱ्यांनी शेतकरी विजय प्रभू यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना घेराओ घालत जाब विचारला. यावेळी भडगाव व पिंगुळी पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते. कृषी अधीक्षक नाईकनवरे यांनी कृषी विभागाच्या आणि विमा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून विम्याची रक्कम त्वरित देण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर ५ ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाईल, असे लेखी पत्र कृषी अधीक्षक कार्यालयाकडून शेतकऱ्यांना देण्यात आले.
................
शेतकऱ्यांना काय फायदा?
शेतकऱ्यांना विमा वेळेत न देणाऱ्या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश पालकमंत्री नीतेश राणे यांनी दिले आहेत. त्यांचा हा निर्णय चांगला आहे; पण काळ्या यादीत टाकून शेतकऱ्यांना मागील नुकसान भरपाई स्वरुपातील विम्याची रक्कम मिळणार का, असा प्रश्नही विजय प्रभू यांनी यावेळी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com