‘त्या’ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा
96625
‘त्या’ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा
संदेश पारकर ः नाईकांवरील अॅट्रॉसिटीचा गुन्हा मागे घ्यावा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ४ ः मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून महामार्ग खड्डेमय झाला आहे. त्यामुळे अनेकांचे बळी गेले आहेत. त्याची जबाबदारी ठेकेदार, महामार्ग अधिकारी, सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी घ्यावी. माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर जो अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे, तो मागे घ्यावा आणि त्या अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
येथील एमआयडीसीत त्यांनी काल (ता.३) पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक, माजी उपसभापती बबन बोबाटे, उप तालुकाप्रमुख कृष्णा धुरी, माजी नगरसेवक संतोष शिरसाट, युवा सेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, अवधूत मालंडकर, शोएब खुल्ली, अमित राणे आदी उपस्थित होते. श्री. पारकर म्हणाले, ‘‘श्री. नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यामागे मोठं षडयंत्र आहे. अधिकाऱ्याला जाब विचारला म्हणून त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला, मग गेल्या दहा वर्षांत या मार्गावर अनेक अपघात झाले. या महामार्गाचे काम करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी केली का? खरंतर याबाबत आम्ही अनेक आंदोलने केली. पण, या सगळ्या प्रशासन यंत्रणेवर, सरकारी अधिकाऱ्यांवर, पोलिस यंत्रणा, ठेकेदार, सत्ताधारी नेते यांच्यावर कुठलाही परिणाम झाला नाही. झाराप येथे दुर्दैवी अपघात झाला, त्या अपघाताची माहिती मिळताच श्री. नाईक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. त्या ठिकाणी जनतेच्या संतापाचा कडेलोट होताना दिसत होता, यावेळी नाईक यांनी जनतेच्यावतीने प्रशासनाला जाब विचारला. घटनेदरम्यान ॲक्शनवर रिअॅक्शन आली.’’
----
दहा वर्षांत मार्गावर शेकडो अपघात
गेल्या दहा वर्षांत खारेपाटण-बांदा मार्गावर शेकडो अपघात झाले. अनेकांचा मृत्यू झाला, काही जखमी झाले; मात्र, कुणालाही मदत मिळाली नाही. दुसरीकडे ठेकेदारांना हजारो कोटींची बिले दिली; पण, कामांची तपासणी झाली नाही. बहुतांश पूल नादुरुस्त असून रस्ता धोकादायक वळणांनी भरलेला आहे. अनधिकृत मिडलकटमुळे दर महिन्याला शेकडो अपघात होतात, तरी जबाबदार कुणी नाही. जिल्हावासीयांनी स्वतःहून जमीन दिली, तरी अनेकांना मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे ‘हा हायवे की मृत्यूचा जबडा?’ असा प्रश्न निर्माण झाला आहे, असेही श्री. पारकर यावेळी म्हणाले.
-------------
कार्यक्षम अधिकारी नेमा
श्री. पारकर यांनी महामार्ग विभागाच्या निष्काळजीपणावर टीका करत ठेकेदारांनी जबाबदारी घेऊन दर्जेदार रस्ता तयार करावा आणि मुजोर अधिकाऱ्यांची बदली करून कार्यक्षम अधिकारी नेमावेत, अशी मागणी यावेळी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.