रत्नागिरी-शेतकऱ्यांच्या सुगीला पावसामुळे दृष्ट
००६२५
शेतकऱ्यांच्या सुगीला पावसाची दृष्ट
कापलेले भात भिजल्याने नुकसान : समुद्र खवळल्याने मासेमारीला ब्रेक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी / राजापूर, ता. २६ : सलग चार दिवस पडणाऱ्या पावसाने भात कापणीचा खोळंबा झाला असून, कापलेले भात भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दिवसभरात कधीही पाऊस कोसळत असल्याने भात कापणी करायची कधी आणि कापणी केलेल्या भाताची झोडणी करायची कधी, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे दिवसभराचे नियोजन बिघडले आहे. या पावसाचा परिणाम जिल्ह्यातील सुमारे ७ ते ८ हेक्टर भात क्षेत्रांवर झाला आहे. तसेच वेगवान वाऱ्यामुळे समुद्र खवळलेला असून, सलग दुसऱ्या दिवशी मच्छीमारीला ब्रेक लागला आहे.
दरम्यान, प्रादेशिक हवामान केंद्राच्या सूचनेनुसार रत्नागिरी जिल्ह्यात २७, २८, २९ ऑक्टोबरला तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे. गुरुवार (ता. ३०) नंतर पावसाचा जोर मंदावेल.
यंदाच्या हंगामात गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात भात कापणी विलंबाने सुरू झाली. नवरात्रोत्सवानंतर पाऊस थांबल्यामुळे त्याचा फायदा घेत शेतकऱ्यांनी भात कापणीला सुरुवात केली. या कालावधीत हातातोंडाशी आलेल्या पिकाचे वन्यप्राण्यांकडून नुकसान होत होते. परिणामी, शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. उत्पादन वाया जाऊ नये, यासाठी रात्रीचा पहारा शेतकऱ्यांनी सुरू केला. काही शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेऊन कापणीला सुरुवात केली. ऐन दिवाळीत शेतकऱ्यांचे नियोजन बिघडले. दिवसात अचानक पावसाला सुरुवात होत असल्याने शेतकऱ्यांच्या श्रमावर पाणी फेरले जात आहे. गेल्या चार दिवसांत तर सतत पाऊस पडत आहे. दिवसा भात कापून ठेवणे धोक्याचेच ठरत आहे. त्यामुळे सकाळी भात कापून दुपारी सुकवून, सायंकाळी झोडणी करण्यावर शेतकऱ्याच भर होता; पण त्यातही पावसाने गोंधळ घातला आहे. शनिवार, रविवारी पावसाने दुपारीच हजेरी लावल्यामुळे सकाळी कापलेले भात भिजून गेले आहे. पाऊस पडून गेल्यानंतर ढगाळ वातावरण असल्याने भात व्यवस्थित सुकले नाही. भिजलेल्या भातामधील दाणे खाली पडून गेल्याने उत्पादनावर परिणाम होणार आहे. अनेक ठिकाणी तयार भात पीक आडवे झाले असून, दाण्यांना मोड आल्याचे राजापुरातील काही शेतकऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यात ४६ हजार हेक्टर क्षेत्रांवर भात लागवड झाली होती. त्यातील सुमारे १० ते १५ टक्के क्षेत्र लहरी निसर्गाच्या तडाख्यात सापडल्याचा अंदाज आहे. सलग चार दिवस पाऊस राहिल्यामुळे बळीराजा चिंतेत पडलेला आहे. दिवाळीपूर्वी ज्या शेतकऱ्यांनी भात कापणी केली आहे, त्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, ज्यांचे भात भिजले आहे, त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. लोंबीमधील दाणे पडून जाणे, भिजलेल्या भातामधील तांदूळ काळा पडणे अशा समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.
किनारपट्टी भागात वेगवान वारे वाहत असून, समुद्र खवळलेला आहे. त्यामुळे मच्छीमारी सलग दुसऱ्या दिवशी बंद आहे. त्याचा फटका मच्छीमार व्यवसायिकांना बसला आहे. मासळी कमी असल्याने दर वधारले असून खवय्यांची पंचाईत झाली आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, अशा सूचना मत्स्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. दोन दिवसांत सुमारे एक कोटीची उलाढाल ठप्प झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
पंचनामे करण्याच्या सूचना
लहरी हवामानामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फटका बसला असून, कृषी विभागाकडून तातडीने नुकसानीचे पंचनामे करा, अशा सूचना तालुकास्तरावर दिल्या आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीत कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी नुकसानीची माहिती घेण्यासाठी शेतकऱ्याच्या शेतात धाव घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

