जिल्ह्यात अशांतता पसरविणाऱ्यांना रोखा
03530
जिल्ह्यात अशांतता पसरविणाऱ्यांना रोखा
‘आम्ही भारतीय’ची मागणी; पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १० ः जिल्ह्यात सामाजिक सलोखा राहावा, प्रत्येक नागरिकांना संविधानाने दिलेल्या हक्कानुसार निर्भयपणे व्यवसाय करता यावा, यासाठी समाजात अशांतता पसरविणाऱ्यांवर योग्य कारवाई करावी. जिल्ह्यात सर्वधर्मीय एकोप्याने व सलोख्याने नांदत असताना अल्पसंख्याक बांधवांना धमकावण्याचे व त्यांचे व्यवसाय बंद पाडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. अशा व्यक्तींना आळा घालावा, या मागणीसाठी आज ‘आम्ही भारतीय’च्या वतीने सर्वधर्मीय बांधवांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला.
पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘सिंधुदुर्ग जिल्हा तसेच संपूर्ण राज्यात अल्पसंख्याक समुदायांवर होणारे हल्ले तसेच अल्पसंख्याक समुदायांकडून खरेदी विक्री करू नये, अशा स्वरूपाच्या पोस्ट समाजमाध्यमांवर पसरविल्या जात आहेत. जाणीवपूर्वक द्वेष निर्माण करण्याचे प्रकार सर्वत्र घडत आहेत. त्या सर्व घटनांमुळे या जिल्ह्यातील व राज्यातील अल्पसंख्य समुदाय तसेच संविधान प्रेमी नागरिक व्यथीत झाले आहेत. जिल्ह्यातील बांदा व दोडामार्ग येथील घटना याचे एक उदाहरण आहे.
जिल्ह्यातील व राज्यातील धार्मिक व जातीय सलोखा व बंधुभाव नष्ट करण्याच्या हेतूने जाहीर वक्तव्य, सोशल मीडियावर पोस्ट व व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या व्यक्ती व संघटना यांच्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करावी. व्यवसाय करण्यास अटकाव करणाऱ्या व्यक्ती व संघटनांवर कारवाई करावी, तसेच संबंधित व्यावसायिकांना त्यांचा निर्भयपणे व्यवसाय करता येईल, अशी व्यवस्था निर्माण करावी. समाजात शांतता व सद्भाव राहावा, यासाठी ज्या गावात, शहरात अल्पसंख्याक समाजाची वस्ती आहे, तेथे मोहल्ला कमिटीची नव्याने स्थापना करावी. मोहल्ला कमिटीमध्ये पोलिस प्रशासनाची व्यक्ती व सर्व धर्मातील शांतताप्रेमी व्यक्ती (त्यांचा पूर्व इतिहास विचारात घेऊन) यांची सभासद म्हणून नियुक्ती करावी. मोहल्ला कमिटीची बैठक किमान महिन्यातून एकदा घ्यावी व त्या बैठकीत त्या गावातील, शहरातील सलोखा, शांतता, बंधुभाव टिकविण्याच्या हेतूने सर्व धर्मिय लोकांशी चर्चा करून निर्णय घ्यावेत. तसेच समाज माध्यमांवर विद्वेष पसरविणाऱ्या पोस्ट संबंधित कडक कारवाई करावी. अल्पसंख्याक समुदायाकडून वस्तुंची खरेदी विक्री करू नये, तसेच त्यांच्यावर व्यवसाय बंदी करावी व आर्थिक बहिष्कार टाकावा, अशा स्वरूपाची वक्तव्ये व आवाहन करणाऱ्या व्यक्ती व संघटनांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी.’
---
जिल्ह्यात बंधुभाव कायम राहावा!
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था धार्मिक व जातीय सलोखा व बंधुभाव कायम रहावा यासाठी पोलिस व प्रशासनास सहकार्य करण्यास तयार आहोत, तरी शासनाने गंभीर दखल घेऊन संबंधितांना योग्य आदेश द्यावेत व अल्पसंख्याक समुदायास निर्भयपणे व्यवसाय करण्यासाठी सहकार्य करावे, या मागणीसाठी आज सर्वधर्मीय बांधवांनी मोर्चा काढला. माजी आमदार वैभव नाईक, कमलताई परूळेकर, अॅड. संदीप निंबाळकर, महेश परूळेकर, डॉ. जयेंद्र परूळेकर, मुस्ताक शेख, सरफराज नाईक, इजाज नाईक, रफिक मेमन आदी सहभागी झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

