कोकणाचं कोकणपण ही टिकवलं पाहिजे : प्रसाद गावडे
- rat२४p१२.jpg -
P२५O०६३८५
रत्नागिरी ः परिसंवादात बोलताना ज्येष्ठ साहित्यिक मदन हजेरी आणि डावीकडून प्रसाद गावडे, मल्हार इंदुलकर, प्रा. सुहास बारटक्के, जयू भाटकर आणि दुर्गेश आखाडे.
---
साहित्यनिर्मिती करताना कोकणपण टिकवा
प्रसाद गावडे ः युवा अन् मराठी साहित्याची नवी वाट परिसंवाद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ ः कोकण हा केवळ भौगोलिक परिसर नाही तर पर्यावरणासोबत जगण्याची संधी आहे; पण दुर्दैवानं कोकणचे जे चित्र समाजमाध्यमांवर दिसतंय ते तेवढंच आहे. प्रत्यक्षात आपण खूप काही गमावतोय. जगण्याचं डॉक्युमेंटेशन केलं पाहिजे. साहित्यनिर्मिती करताना कोकणचे कोकणपणही टिकवलं पाहिजे, असे विचार प्रसाद गावडे यांनी युवा आणि मराठी साहित्याची नवी वाट या परिसंवादात व्यक्त केले. कोकणातील स्थलांतर, रोजगारनिर्मिती, इकोटुरिझम, दलालांची भर तसेच शाश्वत जीवनशैली यावरही त्यांनी परखड भाष्य केले.
महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ (मुंबई) आणि नवनिर्माण शिक्षणसंस्था यांच्यावतीने शनिवारी (ता. २२) आयोजित केलेल्या रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनात ते बोलत होते. या वेळी चिपळूणचे युवा कार्यकर्ते मल्हार इंदुलकर, दुर्गेश आखाडे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सुहास बारटक्के आणि ज्येष्ठ साहित्यिक मदन हजेरी उपस्थित होते. या वेळी गावडे म्हणाले, कोकणातला ग्रामीण कष्टकरी तरुण शिकत आहे; मात्र आपल्या आजूबाजूला दिसणारे वास्तव तो मांडत नाही. अलीकडे मी कडवई (ता. संगमेश्वर) गावात येऊन गेलो. कोकणातला मुस्लिम कसा जगतो, संस्कृती परंपरा कशी जपतो यावर मालिका केली. बाहेरून आलेली एक युवती रापणावर पीएच.डी.चा अभ्यास करत होते; मात्र सिंधुदुर्गात आता केवळ दोन ठिकाणी रापण होते. याची जाणीवही झाली. आपण संपतोय, कोकण संपतोय म्हणूनच लिहिणारा तरुणही निर्माण होणे गरजेचे आहे. आपण जे लिहितोय, जे दाखवतोय त्याची कदाचित विक्रीही होऊ शकते, अशी भीतीही त्यांनी परिसंवादात व्यक्त केली. दुर्गेश आखाडे यांनी कोकणातून अनेक नावे राज्यपातळीवर जायला हवीत, अशी माफक इच्छा त्यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ साहित्यिक मदन हजेरी यांनी आजचा युवा लेखक हा समाजमाध्यमांवरून थेट वाचकांना जाऊन भिडतो, असे सांगितले. युवा लेखक नेहमी निडर असतात असे सांगितले. तसेच मल्हार इंदुरकर यांनी आपण स्वतःच्या सोयीनुसार विचार करतो हे साहित्यासाठी धोकादायक असल्याचे सांगतानाच बोलीभाषा जपल्या जातील तेव्हाच साहित्यही जपले जाईल म्हणूनच बोलीभाषेत मूळ पुस्तक यायला हवे, असे सांगितले. परिसंवादाचे अध्यक्ष जयू भाटकर यांनी सहभागी सहकाऱ्यांच्या विचारांचा गोषवारा करतानाच मराठी साहित्य डिजिटलचे कितीही युग आले तरी साहित्यात डिजिटल माध्यमाच्या मर्यादा असल्याचे सांगितले.
चौकट
चॅट जीपीटीचे साहित्यावर अतिक्रमण
ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सुहास बारटक्के यांनी आजच्या तरुणांचे विचार वेगळे आणि साहित्याच्या कल्पनाही बदललेल्या आहेत, शाश्वत काहीच नाही असे सांगताना हे चित्र आश्वासक असल्याचेही नमूद केले. साहित्याविषयी बोलताना या युवकांना एआयशीही झगडायचे आहे. चॅट जीपीटीचे साहित्यावर होणारे संक्रमण जास्त आहे. आजचे युवक आशावादी, सजग आहेत आणि ते साहित्यात नवीन काहीतरी घेऊन येतील आणि ते चांगलेच असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

