-जिल्ह्यातील १ हजार ३९९ वीजग्राहक झाले स्वावलंबी
25O08631
जिल्ह्यातील १ हजार ३९९ वीजग्राहक स्वावलंबी
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना; एकूण ५ मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेत महावितरणचे जिल्ह्यातील १ हजार ३९९ ग्राहक विजेबाबत स्वावलंबी बनले आहेत. त्यांच्या घराच्या छतावर सौलरपॅनेलच्या माध्यमातून ५ मेगावॅटइतकी वीजनिर्मिती होत आहे. वीजबचत, पर्यावरण संरक्षण आणि आर्थिक लाभ अशा तिहेरी फायद्यांनी ही योजना नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी मंडलाचे अधीक्षक अभियंता सुनीलकुमार माने यांनी केले आहे.
केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेस वीजग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. घराच्या छतावर १ ते ३ किलोवॉट क्षमतेच्या सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे घरगुती ग्राहकांना दरमहा सुमारे १२० ते ३६० युनिट वीज मोफत मिळवण्याची
संधी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत मिळत आहे. घरगुती वीजग्राहकांना छतावर सौरऊर्जानिर्मिती संच बसवता यावा यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदराने कर्जाची प्रक्रियाही सुलभ करण्यात आली आहे. याबरोबरच महावितरणकडून १० किलोवॅटपर्यंतच्या अर्जांना स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे. सौर नेट मीटरदेखील उपलब्ध करून देण्यात येत आहे. शासनाच्या या योजनेचा लाभ घेत जिल्ह्यातील १ हजार ३९९ ग्राहक विजेबाबत स्वावलंबी बनले आहेत. याबाबत महावितरणकडूनही जनजागृती केली जात आहे.
---
चौकट
अतिरिक्त वीज विकता येते
एक किलोवॉट क्षमतेच्या प्रकल्पातून सूर्यप्रकाशाच्या उपलब्धतेनुसार, महिना अंदाजे १२० युनिट वीजनिर्मिती होते. वीजग्राहकाच्या गरजेपेक्षा अधिक वीज सौरऊर्जा प्रकल्पातून तयार झाल्यामुळे वीजबिल शून्य होते तसेच अतिरिक्त वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळवता येते. छतावरील सौरऊर्जा प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून घरगुती वीजग्राहकांना पहिल्या दोन किलोवॅटसाठी प्रत्येकी ३० हजार रुपये आणि तीन किलोवॉट आणि त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल ७८ हजार रुपये अनुदान थेट मिळत आहे. हाउसिंग सोसायट्यांनाही ५०० किलोवॉटपर्यंत प्रतिकिलोवॅट १८ हजार रुपये अनुदान मिळते.

