दापोलीत सहा दिवस पारा ७ अंशावर स्थिर

दापोलीत सहा दिवस पारा ७ अंशावर स्थिर

Published on

१०७०७


दापोलीत सलग सहा दिवस पारा ७ अंशांवर
थंडीचा कडाका वाढला ः हापूस कलमांना मोहोर येण्यावर मर्यादा शक्य
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ ः मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोली तालुक्यात सलग सहा दिवस पारा ६ ते ८ अंश सेल्सिअस दरम्यान आहे. जिल्ह्यात सर्वत्र कडाक्याची थंडी असून दिवसाही गारवा जाणवत आहे. या वातावरणाचा परिणाम हापूसवर होणार आहे. प्रमाणापेक्षा अधिक थंडी असल्याने झाडांना मोहोर येणे थांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गुहागर, दापोलीत हे प्रमाण अधिक राहणार आहे. त्या भागातील आंबा उशिराने येईल, असे बागायतदारांकडून सांगितले जात आहे.
हिमालयाच्या पट्ट्यात निर्माण झालेल्या तीव्र शीतलहरींचा दक्षिणेकडे सरकणारा प्रवाह गेल्या आठवड्यापासून वाढला आहे. त्या थेट महाराष्ट्रात पोहोचल्याने तापमानात लक्षणीय घट झाली आहे. केंद्रीय हवामान विभागाने पुढील ३६ तास थंडीचा कडाका आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली आहे. विशेषतः कोकणात थंडी अधिक जाणवेल, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठाच्या हवामान केंद्रात सलग आठ दिवस १० अंशांपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे दापोलीत रात्रीच्यावेळी सर्वत्र शेकोट्या पेटलेल्या पहायला मिळत आहेत. सकाळच्या सुमारास फिरायला बाहेर पडणारेही स्वेटर, कानटोपी या पेहराव्यात पहायला मिळत आहेत. रत्नागिरीसह चिपळूण, संगमेश्वर, गुहागर या भागांमध्ये गेले सहा दिवस थंडगार वाऱ्यांचा जोर कायम होता. हवामान विभागाने यापूर्वीच या आठवड्यात थंडीची लाट येणार असल्याचा इशारा दिला होता आणि तो तंतोतंत खरा ठरला आहे.
कडाक्याच्या थंडीचा सर्वाधिक परिणाम हापूस आंब्यावर होत आहे. तापमान १८ ते २१ अंशांपर्यंत राहिले, तर ते हापूसला पोषक असते. गेल्या काही दिवसांत थंडीमुळे मोहोर येण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली होती. बहुसंख्य झाडांना मोहोर दिसत आहे. मात्र, गोठवणाऱ्या थंडीने मोहोर येण्याच्या प्रक्रियेला ब्रेक लागला आहे. पारा जोपर्यंत वर येत नाही, तोपर्यंत ही परिस्थिती कायम राहणार आहे. भविष्यात मोहोर वांझ येण्याचीही भीती बागायतदारांमध्ये निर्माण झालेली आहे. यंदा एक महिना हंगाम लांबणार हे निश्चित आहे. त्यात गुहागर, दापोली पट्ट्यातील आंबा आणखीन विलंबाने येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. हे चित्र पुढील पंधरा दिवसांत स्पष्ट होईल, असे बागायतदारांकडून सांगण्यात येत आहे.


तारीख कमाल (अं. से.) किमान (अं. से.)
* १४ डिसेंबर ३२.२ ७.६
* १३ -- ३१.२ ७.०
* १२ -- ३१.९ ६.७
* ११ -- ३१.९ ६.२
* १० -- ३२.१ ७.२
* ०९ -- ३२.२ ८.७
* ०८ -- ३१.७ ११.४


कोट १
तापमान दहा अंशांपेक्षा कमी राहिल्याचा परिणाम हापूसवर काही प्रमाणात होणार आहे. परिसरातील बागांमध्ये मोहोर येण्याची प्रक्रिया थांबेल आणि हंगाम लांबेल. त्याचबरोबर कडाक्याच्या थंडीमुळे मोहोर आणखी दोन वेळा फुटण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी वांझ मोहोर येईल. यासाठी आंबा बागांचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
- सलील दामले, आंबा बागायतदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com