विषमुक्त पिकासाठी जमिनीचे आरोग्य जपा
swt184.jpg
11517
बांबुळी ः शेतकरी मेळाव्यात बोलताना डॉ. विकास धामापूरकर. बाजूला भाग्यश्री नाईकनवरे, भास्कर चौगुले, श्रीमती मुळे, नीलेश गोसावी, प्रशांत परब, सुभाष बांबुळकर, अभय परब.
विषमुक्त पिकासाठी जमिनीचे आरोग्य जपा
डॉ. विकास धामापूरकरः बांबुळीत शेतकरी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १८ः जमीन हा सृष्टीचा मूलभूत आधार आहे. मानवी जीवनाच्या अन्न, वस्त्र, निवारा या प्रमुख गरजा या नैसर्गिक स्रोतामधून वर्षानुवर्षे पूर्ण केल्या जात आहेत. सृष्टीवरील ९० टक्केपेक्षा जास्त सजीव जमिनीतून उत्पन्न होणाऱ्या अन्नावर अवलंबून आहेत. विषयुक्त अन्नामुळे माणसाच्या आरोग्यावर विपरित परिणाम झालेला आहे. पुढील पिढी निरोगी व सुदृढ जन्माला यावी, यासाठी आतापासूनच खालावलेल्या जमीन आरोग्याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्गचे मृदा शास्त्रज्ञ डॉ. विकास धामापूरकर यांनी केले.
जागतिक मृदा दिनानिमित्त बांबोळी येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, कुडाळ तालुका कृषी अधिकारी भास्कर चौगुले, जिल्हा मृद चाचणी अधिकारी श्रीमती मुळे, ‘आत्मा’चे नीलेश गोसावी, बांबुळी सरपंच प्रशांत परब, उपसरपंच सुभाष बांबुळकर, कुडाळ पंचायत समिती माजी सभापती अभय परब उपस्थित होते.
डॉ. धामापूरकर म्हणाले, ‘‘आज शेतकरी कुठलीही पीक पद्धतीचा वापर करीत असले तरी पिकामध्ये रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशके यांचा अवाजवी आणि असंतुलित वापर केला जात आहे. त्यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडले आहे. जमिनीमध्ये असलेले सूक्ष्म जीव-जंतू व गांडूळ त्यांची संख्या कमालीची कमी झालेली आहे. त्यामुळे जमिनीचा जिवंतपणा नष्ट झालेला आहे. मातीचा जिवंतपणा हा जमिनीमध्ये असलेल्या असंख्य सूक्ष्म जीवजंतूंच्या संख्येवर अवलंबून आहे आणि हेच जीव-जंतू पीक वाढीसाठी आवश्यक वातावरण जमिनीच्या गर्भामध्ये तयार करत असतात. त्यांना खाद्य मिळण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने शेतीमध्ये सेंद्रिय पदार्थांचे चक्रीकरण करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी हिरवळीच्या खताचा वापर करावा, जेणेकरून रासायनिक खतांची मात्रा कमी लागेल व जमिनीची सच्छिद्रता वाढवून जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता व पाणी मुरण्याचा वेग यामध्ये बदल घडून येईल. हिरवळीच्या खतांचा वापर, देशी गांडुळांची संख्या वाढविणे, सूक्ष्मजीव जंतूंची संख्या वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे, शेतीमध्ये आच्छादनाचा वापर करणे, अशा काही सोप्या गोष्टींचा अंतर्भाव शेतीमध्ये केला तर शाश्वत पीक उत्पादनाबरोबरच विषमुक्त पीक शेतकरी घेऊ शकतो.’’
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कुडाळ तालुक्यातील सर्व सहाय्यक कृषी अधिकारी तसेच उप कृषी अधिकारी यांनी फार मेहनत घेतली. कार्यक्रमाला दशक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. श्रीमती साटम यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

