शेतीतील मनुष्यबळावर नेपाळी हे उत्तर0

शेतीतील मनुष्यबळावर नेपाळी हे उत्तर0

Published on

बोल बळीराजाचे .......लोगो
(१३ डिसेंबर टुडे ३)

शेतीतील मनुष्यबळावर
नेपाळी हे उत्तर...

गरज ही शोधाची जननी खरी. गरजेनी यांत्रिकीकरण निर्माण झालं पण; आता यंत्राशिवाय काम ही कल्पनाच भीषण झाली आहे. आता आंब्याच्या झाडालाच मशिन केल्यावर त्याच्यासाठी सजीव रसरशीत आंब्याची नाही तर ‘फायनल प्रॉडक्ट्स’चीच अपेक्षा असणार ना..? कितीही धावले तरी दोन पावलातलं अंतर ठरलेलेच आहे..; पण यूज अँड थ्रो’ च्या जमान्यात माझ्या बळीराजावर धावत दोन-तीन पायऱ्या चुकवत उच्चस्थानी पोचण्याची स्वप्नं लादली जात आहेत. काळाच्या कसोटीवर या प्रश्नापासून माझा बळीराजा शिकेलही....फक्त त्याच्या पुढच्या पिढीच्या तळपायला तरी ही लाल माती लागायला हवी.
- rat१९p४.jpg-
25O11742
- जयंत फडके
जांभूळआड, पूर्णगड रत्नागिरी
-----
माझ्या कोकणातील बळीराजाच्या अनेक प्रश्नांवर गेले वर्षभर चर्चा, संवाद साधण्याची संधी मिळाली. अजूनही अनेक प्रश्नांवर विचारमंथन होऊ शकते; पण मजूर समस्या हा फक्त कोकणातील शेतीपुरताच मर्यादित विषय नाही. कमी-जास्त प्रमाणात सगळीकडेच हा प्रश्न जटिल बनत चालला आहे. कोकणच्या तथाकथित अविकसितेचे मुख्य कारण सांगितले जाते की, इथे रोजगार नाही. शेतीत तर अमर्याद रोजगाराच्या संधी आहेत; पण मनुष्यबळ नाही. त्याहून मती गुंग करणारी गोष्ट म्हणजे रोजगार आहे. काही करून माणसे मिळालीच तर ती मनापासून काम करत नाहीत. आता तर काम अर्धवट सोडून पळतात आणि ज्या माणसांच्या उपलब्धतेच्या भरवशावर बळीराजा विसंबून राहतो तीच माणसे त्याचं तोंड फोडतात.
बळीराजाचे दोन हात किती काम करणार, याला निश्चितच मर्यादा आहेत; पण अनुभव, नियोजन, गुंतवणूक याच्या भक्कम पाठबळावर शेकडो हातांकडून काम करून घेणं शक्य आहे; पण हे हात आणायचे कुठून? चुकीच्या शैक्षणिक धोरणानं अर्धवट शिक्षित पिढ्या तयार झाल्यात. कोणतंही काम कमी दर्जाचे नसते हे वाक्य ऐकायला बरं वाटत असलं तरीही कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त पैसा मिळण्याचं मृगजळ सर्वच क्षेत्रात आहे. संपन्नतेच्या भ्रामक कल्पनेत मोबाईल, सूटबूट, गाडी, शहरी राहणी या भूलभुलैयात कामाची आणि माणसांची सांगड घालणे कठीण झालंय. काही प्रमाणात यांत्रिकीकरण, कंत्राटी काम, दूरच्या प्रदेशातील कामगार आणून कामे करून घेण्याचे प्रयत्न आपापल्या कुवतीनुसार अवलंबले जात आहेत; पण हे प्रश्नाचे कायमचे उत्तर होऊ शकत नाही. हे बऱ्याच प्रमाणात आजचे मरण उद्यावर ढकलणे आहे.
कोकणात अनेक शेती, बागायतीतून केली जाणारी कामे यांत्रिकीकरणाचा ध्यास धरून करण्यावर आधुनिक बळीराजाचा भर दिसतो; पण सर्वच कामात ते शक्य नाही. अनेक यंत्रात त्रुटी आहेत किंवा ती निर्माण करताना कोकणातील भौगोलिक परिस्थितीनुसार नियोजन दिसत नाही. ड्रोनने फवारणी कोकणातील डोंगरदऱ्यात सध्यातरी कल्पनाच वाटते. ती यंत्रसामग्री चालवायला पुन्हा प्रशिक्षित मनुष्यबळ हवे. आपल्या शिक्षणव्यवस्थेत असे मनुष्यबळ निर्माण करण्याचे काही नियोजनच नाही. कंत्राटी कामही नव्या युगातील परवली आहे. कोकणातील बळीराजाची काही कामं या पद्धतीनं होत आहेत, काही कामात अजून संधी आहेत; पण कंत्राटी कामात दर्जा, सचोटी याची बोंब होतेच. नेपाळी कामगार हा कोकणातील आंबा बागायतदार, मासेमारी व्यावसायिक यांचा जणू आत्मा आहे. काही वर्षापूर्वी फक्त वानर-माकडं, चोरीसाठी रखवालदार म्हणून येणारे नेपाळी आता कोकणात काय करत नाहीत, ते विचारा अशी परिस्थिती आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीवर हे संकट अधिक गडद बनत आहे. यंदा तर नेपाळमधील अस्थिर राजकीय परिस्थिती कोकणातील बागायतदारांसाठी कसोटी ठरत आहे. काही वर्षांत गरजेची जागा मक्तेदारीत परावर्तित झाल्याने आता नेपाळी ठरवतील ती मजुरी अशी वेळ आली आहे. मुंबई भैयांवर चालते या वाक्याने जेवढा गदारोळ झाला होता तितकीच दुसऱ्या टोकाची शांतता नेपाळी आले नाहीत तर आंबा, मासेमारी उद्योग बंद पडेल या वाक्यात सामावली आहे. या साऱ्या परिस्थितीचा अंदाज नेपाळीनीही पक्का जाणला आहे. त्याचे दुष्परिणाम यंदा तर प्रकर्षाने जाणवत आहेत. मूलभूत कारण म्हणाल तर, शेती हा व्यवसाय झाला आहे.. हे तर नसेल?

(लेखक प्रगतिशील आणि प्रयोगशील शेतकरी आहेत.)
---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com