साहित्यात समाजमनाचे प्रतिबिंब उमटावे
13772
साहित्यात समाजमनाचे प्रतिबिंब उमटावे
प्रवीण देशमुख ः शिरोडा खटखटे ग्रंथालयात प्रेरणा साहित्य संमेलन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २७ ः समाजाचे हित साधणारे ते खरे साहित्य असते. म्हणून सामाजिक ताणतणाव कमी करणारे, समाजमनाचे प्रतिबिंब ज्यामध्ये उमटेल, अशा प्रकारचे साहित्य निर्माण व्हायला हवे, असे प्रतिपादन कल्याण येथील नामवंत साहित्यिक तथा साहित्यिक चळवळीतील कार्यकर्ते प्रवीण देशमुख यांनी केले.
आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याने शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयाच्या सहयोगाने थोर साहित्यिक वि. स. खांडेकर सभागृहात प्रेरणा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी स्वागताध्यक्ष ग्रंथप्रेमी भालचंद्र जोशी, कट्ट्याचे समन्वयक सुप्रसिद्ध कवी विनय सौदागर, खटखटे ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते रघुवीर ऊर्फ भाई मंत्री, कार्यवाह सचिन गावडे व्यासपीठावर उपस्थित होते.
गायक शेखर पणशीकर यांनी सादर केलेल्या गीताने संमेलनास प्रारंभ झाला. सौदागर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सचिन गावडे यांनी परिचय केला. स्वागताध्यक्ष जोशी यांनी वाचनाचे महत्त्व विशद केले.
‘साहित्यिक संस्थांचे सामाजिक स्वास्थ्यात योगदान’ या विषयावरील परिसंवादात प्रीतम ओगले (आनंदयात्री, वेंगुर्ले), मंगेश मसके (कोकण मराठी साहित्य परिषद, सिंधुदुर्ग) यांनी आपले विचार मांडले. मांद्रे (गोवा) येथील ‘साहित्य संगम’ संस्थेचे कार्यवाह प्रा. गजानन मांद्रेकर हे परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी होते. (कै.) कुमुद रेगे स्मृती वाचन साधना उपक्रमाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्यिक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते अनंत वैद्य व अभिनेते प्रसाद रेगे यांच्याहस्ते उद्घाटन झाले.
भोजनोत्तर पहिल्या सत्रात देवगड येथील कवयित्री तथा स्तंभ लेखिका अपर्णा प्रभूपरांजपे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कवी संमेलनाला प्रतिसाद मिळाला. ‘स्मरण रवी-शंकरांचे’ कार्यक्रमात सौदागर, प्रा. नीलम कांबळे, प्रा. मानसी मांद्रेकर, रवींद्र पणशीकर यांनी कथांचे वाचन केले. शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थ्यांचा सन्मान केला. शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी रोहित आसोलकरचा संमेलनाध्यक्ष देशमुख यांच्याहस्ते गौरव करण्यात आला. अनिल निखार्गे यांनी विचार व्यक्त केले. देशमुख यांनी संमेलनाचा समारोप केला.
समारोप सोहळ्यानंतर स्थानिक नाट्यकलाकार काशिनाथ मेस्त्री, हर्षदा बागायतकर व रवींद्र पणशीकर यांनी ‘एकच प्याला’ नाटकातील भावपूर्ण प्रवेश सादर केला. डॉ. श्रीराम दीक्षित यांनी सूत्रसंचालन केले. संमेलनास प्रसिद्ध कवी डॉ. सुधाकर ठाकूर, साहित्यिक बाळकृष्ण राणे, आरोंदा हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक अरुण धरणे, आंबा व्यावसायिक जनार्दन पडवळ आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

