

swt208.jpg
58450
बाबी जोगी
भूमिगत वीज वाहिन्यांचे काम का रखडले?
बाबी जोगी ः सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या कामाचा हिशेब द्यावा
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २० : माजी आमदार वैभव नाईक यांनी मंजूर केलेले आणि मालवण शहरातील नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले भूमिगत वीज वाहिन्यांचे काम नगरपरिषद सत्ताधारी आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे रखडले असल्याचा आरोप ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख बाबी जोगी यांनी केला. विकासकामांवरून नेहमी वैभव नाईक यांच्या नावाने टाहो फोडणाऱ्या नगरपरिषद सत्ताधाऱ्यांच्या उदासीनतेमुळे शहरातील भूमिगत वीज वाहिन्यांचे काम रखडले असून याचे स्पष्टीकरण जनतेला द्यावे, असे थेट आव्हानही त्यांनी दिले आहे.
श्री. जोगी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, माजी आमदार वैभव नाईक यांनी आपल्या कार्यकाळात शहराच्या हितासाठी हे काम मंजूर करून आणले होते. नगरपरिषद सत्ताधाऱ्यांनी सर्व राजकारण बाजूला ठेवून हे काम जलदगतीने पूर्ण करणे आवश्यक होते, परंतु त्यांना ते जमले नाही. केंद्रात, राज्यात, जिल्ह्यात आणि मालवण नगरपरिषदेत सत्ता असतानाही सत्ताधारी नगराध्यक्ष आणि नगरसेवक प्रत्येक प्रश्नाचे खापर वैभव नाईक यांच्यावर फोडत आहेत. मग भूमिगत वीज वाहिन्यांचे काम नेमके कोणामुळे थांबले आहे, याचा जाब सत्ताधाऱ्यांनी मालवणच्या जनतेला दिला पाहिजे.
पर्यटनाच्या दृष्टीने मालवणला संपूर्ण राज्यात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, सध्या या ठिकाणी वीज पुरवठ्याची समस्या अत्यंत गंभीर बनली आहे. अनेक वेळा शहरातील नागरिकांना दोन ते तीन दिवस विजेविना राहावे लागते. या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा म्हणून वैभव नाईक यांनी भूमिगत वीज वाहिन्यांची योजना मंजूर करून आणली होती. मात्र, हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी पार पाडण्यात सत्ताधारी पूर्णपणे अपयशी ठरत आहेत.
‘‘शहरातील जनतेला राजकारण नको, तर दर्जेदार सुविधा हव्या आहेत. वीज हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित मूलभूत प्रश्न आहे. त्यामुळे वैभव नाईक यांच्या नावाने राजकारण करण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या कारभाराचा हिशोब द्यावा,’’ असा टोला जोगी यांनी लगावला.
सध्या आमदार नीलेश राणे, खासदार नारायण राणे आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे हे सत्तेत असताना देखील मालवण नगरपरिषदेतील भूमिगत वीज वाहिनीचे काम रखडणे म्हणजे सत्ताधाऱ्यांची निष्क्रियताच आहे, अशी टीकाही बाबी जोगी यांनी केली आहे.