

kan255.jpg
59490
फोंडाघाट ः येथील महाविद्यालयात वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार यांनी मार्गदर्शन केले.
क्षणाची घाई ठरू शकते आयुष्यभराचे नुकसान
गणेश पवार ः फोंडाघाट महाविद्यालयात रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत मार्गदर्शन
फोंडाघाट, ता. २५ ः रस्त्यावर वाहन चालविताना केलेली काही क्षणांची घाई आयुष्यभराचे नुकसान करू शकते. त्यामुळे वाहनाचा वेग परिस्थितीनुसार नियंत्रित ठेवणे, वाहतूक सिग्नलचे पालन करणे, ओव्हरटेक करताना दक्षता घेणे आणि वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन कणकवली येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पवार यांनी केले.
फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियम, रस्ता सुरक्षा आणि जबाबदार वाहनचालकाची भूमिका याबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित रस्ता सुरक्षा अभियानात ते बोलत होते.
एनएसएस विभागप्रमुख प्रा. जगदीश राणे यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाहतूक नियमांचे पालन करणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे नैतिक कर्तव्य असल्याचे सांगितले. दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करा. स्वतःच्या सुरक्षिततेबरोबरच रस्त्यावरून जाणाऱ्या इतर व्यक्तींच्या जीविताचीही काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पवार यांनी वाहतूक नियमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि त्यासंदर्भातील कायदेशीर बाबी याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. ‘नियम पाळा, अपघात टाळा’ हा संदेश प्रत्येकाने आपल्या आचरणातून प्रत्यक्षात आणावा, असे आवाहन त्यांनी केले.
संस्थेचे चेअरमन महेश सावंत म्हणाले की, पालकांनी मुलांना वाहन देताना केवळ वाहन चालविण्याचे प्रशिक्षण न देता वाहतूक शिस्त आणि जबाबदारीची जाणीवही करून द्यावी. सुभाष शिवगण, स्नेहा बर्गे, श्रीकांत महामुनी उपस्थित होते.