खेडच्या पोलिस निरीक्षक पत्की यांची बदली ; विधान परिषदेत गृहमंत्र्यांची घोषणा

transfer order of PI suvarna patki from home minister anil deshmukh in ratnagiri
transfer order of PI suvarna patki from home minister anil deshmukh in ratnagiri

खेड (रत्नागिरी) : खेडच्या पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांची तत्काळ जिल्ह्याबाहेर बदली करणार, तसेच त्यांच्यावरील सर्व आरोपांची चौकशी करून कारवाई करणार, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान परिषदेत केली. रामदास कदम यांनी सभागृहात पत्की यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर गृहमंत्र्यांनी ही घोषणा केली. 

पोलिस निरीक्षक पत्की यांच्या कारभाराबाबत ताशेरे ओढत रामदास कदम यांनी केलेली टीका, तसेच शिवसेनेच्या मंत्र्याचा केलेला उल्लेख यामुळे खेड शहरात आज दिवसभर चर्चा होती. यानिमित्ताने शिवसेना आणि मनसे यांच्यात कलगीतुराही रंगला. पत्की यांच्याविरोधातील गंभीर आरोप बाजूला राहिले आणि राजकारण, आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याची सद्यस्थिती आहे.
वैभव खेडेकर यांनी ‘सकाळ’ला सांगितले, नगराध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धेसाठी खेडच्या पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांना आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून निमत्रंण दिले होते. कोविड काळात अत्यंत चांगली कामगिरी त्यांनी केली असल्यामुळे त्यांचा कोविड योद्धा म्हणून आम्ही सत्कार करणार होतो; परंतु त्या क्रिकेट स्पर्धेच्या उद्‌घाटन कार्यक्रमाला आल्या नाहीत. क्रिकेट स्पर्धेला उपविभागीय अधिकारी अविनाश सोनोने यांनी परवानगी दिली. पोलिस निरीक्षकांची परवानगी घेणे हा विषयच नव्हता.

शिवसेनेचे नाव न घेता केलेल्या या टीकेवर उत्तर देताना आमदार कदम यांनी सांगितले की, यापूर्वी झालेल्या आमदार चषक स्पर्धांचा उल्लेख करून जनतेची खोटी सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न मेसेज व्हायरल करून करत आहेत. आमदार चषक स्पर्धांच्या कालावधीत मनाई आदेश व रात्रीची संचारबंदी लागू नव्हती. आमदार चषक स्पर्धांना मिळालेला प्रतिसाद पाहून पोटशूळ उठलेल्या विरोधकांनी शासनाचे निर्बंध पायदळी तुडवून स्पर्धा आयोजित केल्या. त्यामुळे कारवाई होणारच. स्वतःच्या बालिश हट्टांचे खापर विरोधकांनी आमच्यावर फोडू नये.

मनसेकडून डिवचणारी पोस्ट

मनसेकडून व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, दापोली मतदारसंघातील सर्व कामे संपली. आता क्रिकेट स्पर्धेमुळे त्रास होतो. निसर्ग वादळामधील भरपाई अजून मिळाली नाही. अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाची भरपाई नाही. मुंबई-गोवा महामार्ग निकृष्ट दर्जाचे काम, तरुणांचे रोजगाराचे प्रश्‍न, एकही मोठा प्रकल्प मतदारसंघात नाही, ३० वर्षे राज्य करून अजूनही मतदारसंघात पाणी टंचाई, सिंचनाचे प्रश्‍न प्रलंबित यावर विधानसभेत आवाज उठवला नाही. आठ दिवसांपूर्वी झालेल्या आमदार चषकाला हजारोंची गर्दी होती. यावर विधानसभेत आवाज नाही.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com