रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात सुमारे ७८ हजार झाडे तोडण्यात आली आहेत. एका अर्थाने विकासासाठी द्यावी लागलेली ही मोठी किंमत आहे. रस्त्याच्या दुतर्फा पुन्हा झाडे वाढणे आवश्यक असून, मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत प्रत्येक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून ही झाडे लावण्याचा संकल्प विद्यापीठाने सोडला आहे, अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी दिली.तसेच याबाबत ‘सकाळ’ने घेतलेल्या पुढाकाराचे त्यांनी कौतुक केले.
रत्नागिरी येथील विद्यापीठ उपकेंद्राला त्यांनी नुकतीच भेट दिली. तसेच तेथील कर्मचारी व जिल्ह्यातील प्राचार्यांशी संवाद साधला. पार आंबडवे गावापर्यंत त्यांचा दौरा होता. या दरम्यान येथील विद्यापीठ उपकेंद्रात ‘सकाळ’ने त्यांच्याशी संवाद साधला, तेव्हा डॉ. पेडणेकर म्हणाले, सामाजिक भान जागविणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत मुलांकडून महामार्गालगतच्या पट्ट्यात झाडे लावण्यात येणार आहेत. ही झाडे वाढविण्याची आणि राखण्याची जबाबदारीही अनेकांच्या साह्याने विद्यार्थ्यांनी पार पाडावी, अशी अपेक्षा आहे. एकेका महाविद्यालयाला ठराविक अंतराचा भाग यासाठी दिला जाणार आहे. संपूर्ण मार्गालगत झाडे लावण्याची योजना बनविण्यात येईल, तसेच त्याचा तपशीलही निश्चित करण्यात येणार आहे. मात्र, हा संकल्प विद्यापीठाने घेतला आहे.
महामार्गालगत झाडे अजून दोन किंवा तीन वर्षानंतर लावण्यात येणार आहेत. त्यासाठी अगदी नवीन रोपे लावण्याऐवजी दोन वा तीन वर्षे जगवलेली रोपे दिल्यास रस्त्यालगत झाडे जगण्याचे प्रमाण मोठे असेल, अशी कल्पना मांडून ‘सकाळ मीडिया ग्रुप’ने याबाबत प्राथमिक काम सुरू केले आहे. यासाठी दोन बैठकाही घेण्यात आल्या आहेत. लांजाचे विवेक सावंत, शौकत मुकादम, तसेच चिपळुणातील स्वयंसेवी संस्था यांनी ही संकल्पना उचलून धरली आहे. यामध्ये महामार्गालगतच्या ग्रामपंचायती, स्थानिक स्वयंसेवी संस्था यांनाही सहभागी करून घेता येईल. त्यामुळे झाडे लावण्यापासून जगवण्यापर्यंत लोकसहभाग असेल, अशी ‘सकाळ’ची कल्पना कुलगुरू यांना सांगण्यात आली. त्यावर ‘सकाळ’ने याबाबत मांडलेली कल्पना स्तुत्य आहे. आपण एकत्रित काम करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या वेळी विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. पुराणिक, रत्नागिरी जिल्हा समन्वयक डॉ. मराठे हेही उपस्थित होते.
झाडे लावण्याची जबाबदारी कंत्राटदारावर आहेच. मात्र, ती जगावीत यासाठीची जागल्याची भूमिका तसेच लावावयाची झाडे कोणती असावीत, पारंपरिक देशी झाडे, येथील वृक्ष, चौपदरीकरणात नष्ट झालेल्या दुर्मिळ वनस्पती व वनराईतील जैवविविधता टिकविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. त्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन व बैठकही घेण्याची भूमिका ‘सकाळ’ने मांडली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.