या रेल्वे प्रकल्पाला का मिळेना गती..?

Vaibhavwadi Kolhapur Railway Railroad in sindudurg kokan marathi news
Vaibhavwadi Kolhapur Railway Railroad in sindudurg kokan marathi news

वैभववाडी (सिंधुदूर्ग) :  बहुचर्चित वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाला मंजुरी मिळून वर्ष लोटले असले तरी या रेल्वेमार्गाला गती मिळत नसल्याचे सध्या चित्र आहे. ३ हजार २०० कोटी अपेक्षित असलेल्या या प्रकल्पाकरीता गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पात २५० कोटींची तरतूद केली होती. दरम्यान, आर्थिक मंदीमुळे या प्रकल्पाला गती मिळत नसल्याची चर्चा आहे.

पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोल्हापूरला जोडणारा वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्ग व्हावा, अशी कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातील लोकांची अनेक वर्षांपासून मागणी होती. त्या अनुषंगाने कोकणातून अनेक मार्गाचे प्राथमिक सर्वेक्षण झाले. त्यातील वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्ग सोयिस्कर असल्याचे पुढे आले. त्यानंतर सातत्याने कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मंडळींनी पुढाकार घेतला. या मागणीची दखल तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी घेतली. त्यांच्या कार्यकाळात या रेल्वेमार्गाचे एका खाजगी कंपनीकडून गुगलमॅपच्या सहाय्याने सर्वेक्षण करण्यात आले.

श्री. प्रभू यांचा राजिनामा या कारणासाठी
१०७ किलोमीटर लांबीच्या या रेल्वेमार्गावर एकूण दहा स्थानके नियोजित आहे. या रेल्वेमार्गासाठी त्यावेळी अंदाजित खर्च ३ हजार २०० कोटी अपेक्षित धरण्यात आला होता. श्री. प्रभू यांनी हा रेल्वेमार्ग मार्गी लावण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले असतानाच देशातील विविध भागात झालेल्या रेल्वे अपघाताची जबाबदारी स्विकारीत त्यांनी रेल्वेमंत्रिपदाचा राजिनामा दिला. 
त्यामुळे मंजुरीच्या ऐन टप्प्यावर असताना या मार्गाची मंजुरी रखडली होती. त्यानंतर श्री. प्रभूनीच केलेल्या पाठपुराव्यामुळे २०१९ च्या अर्थसंकल्पात रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी वैभववाडी-कोल्हापुर रेल्वेमार्गाला मंजुरी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना

या मार्गासाठी ५०० कोटीची आर्थिक तरतुद केल्याचे बोलले जात होते.या सर्व प्रकियेला आता वर्षभराचा कालावधी लोटला आहे; परंतु त्यानतंर हा रेल्वेमार्ग होण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल पडताना दिसत नाही. वर्षभरात कोणतीही गती या नियोजित मार्गाला मिळताना दिसत नाही. त्यामुळे आर्थिक मंदीमुळे या मार्गाचे काम रखडले असल्याचे तालुक्‍यात बोलले जात आहे. या रेल्वेमार्गामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार होती. अनेक बंदराचा विकास या मार्गामुळे शक्‍य होता; परंतु एकुण या मार्गाची वाटचाल पाहता हा रेल्वेमार्ग स्वप्नवत वाटु लागला आहे.

असा आहे नियोजित मार्ग
वैभववाडी-सोनाळी-कुसुर-कुंभारवाडी-उंबर्डे-मांगवली-उपळे-ऐनारी-सैतवड-कळे-भुये-कसबाबावडा -मार्केटयार्ड

केंद्र सरकारकडे पाठपुरावा

माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांच्या पाठपुराव्यामुळे वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाली आहे. हा मार्ग व्हावा, यासाठी जिल्ह्यातील जनतेची मागणी आहे. सध्या या नियोजित मार्गाच्या कामांची स्थिती काय आहे, हे जाणून घेऊन तो होण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल.
- प्रमोद जठार, माजी आमदार तथा माजी जिल्हाध्यक्ष भाजप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com