रत्नागिरी : कोरोना आणि अवकाळी पावसामुळे दुहेरी संकटात सापडलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदारांसमोर आणखी एक मोठे संकट गुजरातच्या व्यापाऱ्यांनी उभे केले आहे. गुजरातच्या आंब्याचा पल्प काढून तो रत्नागिरी हापूसच्या नावे बाजारात विकला जात असल्याचा आरोप येथे होत आहे. त्यांच्या अतिक्रमणामुळे स्थानिक बागायतदार आणि व्यावसायिक अडचणीत आले आहेत. एमआयडीसीतील एका कंपनीमध्ये ट्रक येत असून तेथे हा पल्प तयार करून विकला जात असल्याचे बागायतदारांनी सांगितले.
आंबा बागायतदार आणि रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी याबाबात आरोप केला आहे, की रत्नागिरी हापूसच्या नावाखाली गुजरातच्या आंब्याचा पल्प विकला जात आहे. यामध्ये स्थानिक बागायतदार, व्यापारी आर्थिक संकटात सापडला आहे. संबंधित यंत्रणेने यावर तत्काळ कारवाई करावी.
हे पण वाचा - बंगालच्या उपसागरात `अम्फान` ची तीव्रता वाढली
यावर बाजार समिती किंवा पोलिस प्रशासन काही कारवाई करणार का, असा सवाल विचारला जात आहे. आंबा हंगामाला यंदा तरी चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा होती; परंतु कोरोनाचे मोठे संकट उभा राहिले आणि संपूर्ण देश थांबला. टाळेबंदीमुळे तयार झालेल्या आंब्याला बाजारपेठच नसल्याने आंबा बागायतदार मोठ्या संकटात सापडला. अत्यावश्यक सेवाच सुरू ठेवण्यात आल्या. त्यामुळे आंब्याची जेवढी निर्यात व्हायला हवी होती तेवढी झाली नाही. संपूर्ण वाहतूक थांबल्याने हा प्रश्न निर्माण झाला. कालांतराने आंब्याच्या वाहतुकीलाही परवानगी दिली. तो मोठा दिलासा होता. बागायतदारांनी तयार झालेला आंबा जिल्हा प्रशासनाचे पास घेऊन मुंबई, पुणे, वाशी, सोलापूर, कोल्हापूर आदी भागात पाठवला. त्याला अपेक्षित दर मिळाला नसला तरी मागणीप्रमाणे आंब्याचा पुरवठा सुरू झाला. वर्षभर औषध फवारणीपासून अन्य खर्चाचा ताळमेळ घालताना ही एक जमेची बाजू होती. आता रत्नागिरी हापूसला बाजारपेठ मिळत आहे.
मात्र, आणखी एक संकट या बागायतदारांपुढे आता उभे राहिले आहे. गुजरातच्या व्यापाऱ्यांनी स्थानिक बाजारपेठेत अतिक्रमण केले आहे. गुजरातच्या आंब्याचा पल्प काढून तो रत्नागिरी हापूसच्या नावाखाली विकला जात असल्याचा आरोप होत आहे. याचा स्थानिक बागायतदारांवर मोठा परिणाम होत आहे.
हे पण वाचा - दिलासादायक : रुग्णालयातील चार नर्स सह पाच जणांनी केली कोरोनावर मात...
ट्रकच्या ट्रक दाखल
ट्रकच्या ट्रक एमआयडीसीतील एका कंपनीत दाखल झाले असून तेथे हा पल्प तयार होत आहे. त्यामुळे रत्नागिरी हापूसचे नाव बदनाम करून हे व्यापारी गुजरातच्या आंब्याचा पल्प विकत असल्याचे काही आंबा बागायतदारांनी पुढे आणले आहे. या गाड्यांवर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीकडे नोंद आहे का, किंवा पोलिस दलाकडे याची नोंद आहे का, असा सवालही उपस्थित होत आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.