Asian Games 2023 : आशियाई स्पर्धेआधीच वादविवादांचे ग्रहण; फुटबॉल, कुस्ती, कुराश, घोडेस्वारी खेळांवर परिणाम?

Asian Games 2023 : आशियाई स्पर्धेआधीच वादविवादांचे ग्रहण; फुटबॉल, कुस्ती, कुराश, घोडेस्वारी खेळांवर परिणाम?

Asian Games 2023 : चीनमधील हांगझाऊ येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारत प्रथमच पदकांची शंभरी ओलांडण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे. मात्र त्याआधी फुटबॉल, कुस्ती, कुराश व घोडेस्वारी या खेळांमध्ये वादविवाद निर्माण झाले आहेत. त्यामुळे आता याचा फटका भारताला बसण्याची शक्यता आहे.

भारतीय कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह शरण यांच्याविरोधात भारतातील काही कुस्तीपटूंनी आंदोलन केले. त्यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले. या दरम्यान कुस्तीपटूंना सराव करण्यासाठी वेळ मिळाला नाही. आशियाई स्पर्धेच्या पात्रता फेरीवरून वाद रंगला. मागील सहा महिन्यांतील घडामोडींचा फटका भारतीय कुस्तीपटूंना आशियाई स्पर्धेमध्ये बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

फुटबॉल या खेळामध्ये क्लब वि. देश असा वाद समोर आला. आशियाई स्पर्धेसाठी भारतीय फुटबॉल संघात सर्वोत्तम खेळाडूंची निवड करता आली नाही. इंडियन सुपर लीग (आयएसएल) व आशियाई स्पर्धा एकाच वेळी असल्यामुळे अडचण निर्माण झाली. आयएसएलमधील सहभागी संघांचे व्यवस्थापन आपल्या खेळाडूंना आशियाई स्पर्धेसाठी मुक्त करण्यास तयार नव्हते.

मंगळवारी भारतीय संघाला पहिली लढत खेळायची आहे. पण संघनिवडीच्या वादामुळे रविवारपर्यंत भारतीय खेळाडू मायदेशातच होते. अखेरीस एका बैठकीनंतर सुनील छेत्री याच्यासह संदेश झिंगन, चिंगलसना सिंग व लालचुनुंगा या अनुभवी खेळाडूंची भारतीय संघात निवड करण्यात आली. पण चीन दूतावासाकडून प्रवासाची कागदपत्रे अद्याप आलेली नाहीत. त्यामुळे सलामीच्या लढतीला हे खेळाडू मुकणार आहेत.

पात्रता मिळू नये म्हणून माहिती लपविली

घोडेस्वारी या खेळामध्ये खेळाडूंवर अन्याय झाल्याचे समोर आले आहे. चीनमध्ये भारतीय घोडे घेऊन जाऊ शकत नाहीत. विलीगीकरणाच्या नियमामुळे त्यांना तेथे प्रवेश देत नाहीत. पण ही माहिती गौरव पुंडिर या खेळाडूपासून लपवण्यात आली. भारतीय संघटनेकडून हे करण्यात आले. गौरव म्हणाला, मला ही माहिती त्यांच्याकडून देण्यात आली नाही.

मला त्यांना पुरेसा वेळ द्यायचा नव्हता. त्यामुळे त्यांनी असे केले. मला त्यांना आशियाई स्पर्धेमधून बाहेर काढायचे होते, असा आरोप त्याने केला. तसेच याआधी पाचपैकी एका चाचणीत यशस्वी झाल्यानंतर पात्रता दिली जात असे. पण कोरोनानंतर यामध्येही बदल करण्यात आला. चारपैकी तीन चाचणीमध्ये पात्रता मिळवावी लागत आहे. युवा खेळाडू चिराग खंडाग यानेही २०व्या वर्षीच या खेळामधून माघार घेतली. संघटनेच्या उदासीनतेला कंटाळून त्याने हे पाऊल उचलले.

निवड प्रक्रियेवरच प्रश्‍नचिन्ह

कुराश हा मार्शल आर्ट खेळ म्हणून ओळखला जातो. मात्र आशियाई स्पर्धेसाठी आयोजित करण्यात आलेल्या या खेळाच्या निवड प्रक्रियेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहेत. नेहा ठाकूर या खेळाडूने दिल्ली उच्च न्यायालयात याविरोधात याचिका दाखल केली आहे. दिल्ली पोलिस क्राईम ब्रांचकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. निवड प्रकियेत विसंगती होती. तसेच चुकीच्या खेळाडूची निवड करण्यात आली आहे. असे नेहा हिचे म्हणणे आहे. तसेच सहकारी खेळाडूकडून तिच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचेही नेहाकडून सांगण्यात आले. हे प्रकरण अद्याप न्यायालयात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com