मेलबर्न : युझवेंद्र चहलला पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. निर्णायक तिसऱ्या सामन्यासाठी त्याला स्थान मिळाले आणि मग त्याने स्वत:ची उपयुक्तता दाखवून दिली.. दहा षटकांमध्ये केवळ 42 धावा देत त्याने सहा गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाचा डाव 230 धावांमध्येच संपुष्टात आला. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेपाठोपाठ एकदिवसीय मालिकाही जिंकण्याची भारताला सुवर्णसंधी आहे.
भारताने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी पाचारण केले. या सामन्यासाठी भारताने संघात तीन बदल केले. अंबाती रायडू, महंमद सिराज आणि कुलदीप यादव यांच्याऐवजी केदार जाधव, विजय शंकर आणि चहलला संधी देण्यात आली.
भुवनेश्वर कुमारने दोन्ही सलामीवीरांना स्थिरावण्याची संधीही दिली नाही. ऍलेक्स केरी आणि ऍरॉन फिंच या दोघांनाही त्याने पहिल्या नऊ षटकांमध्येच पॅव्हेलियनमध्ये परत धाडले होते. शॉन मार्श आणि उस्मान ख्वाजाने तिसऱ्या विकेटसाठी मोठी भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला रुळावर आणण्याचा प्रयत्न केला. केदार जाधवच्या गोलंदाजीवर त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला; पण दुसरीकडून चहलने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना बाद करण्याचा सपाटा सुरू केला.
महेंद्रसिंह धोनीच्या चपळ यष्टिरक्षणामुळे मार्श बाद झाला. त्यानंतर ख्वाजा चहलकडेच झेल देऊन बाद झाला. पीटर हॅंड्सकोम्बने अर्धशतक करत एकाकी लढत देण्याचा प्रयत्न केला. त्याला इतरांकडून साथ लाभली नाही.
भारताकडून चहलने सहा, तर भुवनेश्वर आणि महंमद शमीने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.