Sachin Tendulkar | T20 WC: टीम इंडियाचं नक्की काय चुकतंय? सचिनने दिलं उत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sachin Tendulkar

भारताचा पाकिस्तान पाठोपाठ न्यूझीलंडने केला पराभव | Team India Poor Show

T20 WC: टीम इंडियाचं नक्की काय चुकतंय? सचिनने दिलं उत्तर

T20 World Cup 2021: भारतीय संघाचा आधी पाकिस्तानने तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने मोठ्या फरकाने पराभव केला. भारतीय संघ दोन्ही सामन्यात हतबल झालेली दिसली. फलंदाजीत रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा हे सारे अपयशी ठरले. विराटने एक झुंजार अर्धशतकी खेळी केली, पण त्याचा फारसा फायदा झाला नाही. गोलंदाजीतही भारताला पाकिस्तानचा एकही बळी घेता आला नाही. न्यूझीलंडविरूद्धदेखील दोन्ही बळी बुमराहलाच मिळाले. बाकीचे गोलंदाज उपाशीच राहिले. भारताच्या या खराब कामगिरीनंतर मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याने भारतीय संघाचं नक्की काय चुकतंय? याबद्दल मत व्यक्त केलं.

"मी एक गोष्ट प्रामुख्याने पाहिली आहे की जे लेग स्पिनर्स आपल्या गोलंदाजीत चतुराईने मिश्रण करतात ते भारताविरूद्ध यशस्वी होतात. याचाच अर्थ जे आर्म बॉल, गुगली, फ्लिपर, टॉप स्पिन आणि लेग स्पिन अशी मिश्र गोलंदाजी करतात ते गोलंदाज भारताविरूद्धच्या सामन्यात अधिक चांगला खेळ करताना दिसत आहेत. न्यूझीलंडचा इश सोढीने खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली. मिचेल सँटनरनेही चांगली कामगिरी केली. दोघांनी आठ ओव्हर्समध्ये केवळ ३२ धावा दिल्या. त्यांची कामगिरी खूपच चांगली झाली", असं सचिनने नमूद केलं.

Virat Kohli Lead Team India

Virat Kohli Lead Team India

"जेव्हा तुम्ही छोट्या धावसंख्येचा बचाव करत असता, त्यावेळी तुम्हाला पॉवर प्लेमध्ये किमान तीन बळी घेणं अपेक्षित आहे. तसंच तुम्ही जास्त धावादेखील देऊ शकत नाहीत. बुमराहने पॉवरप्ले मध्ये एक विकेट घेतली होती. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. वरूण चक्रवर्तीलाही संधी दिली पण त्याने फारसा फरक पडला नाही. या साऱ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे", असंही सचिनेने सुचवलं.