Ranji Trophy : मुंबई-बडोदा उपांत्यपूर्व फेरीत लढत ; रणजी क्रिकेट करंडक स्पर्धेची बाद फेरी निश्‍चित

यंदाचा रणजी क्रिकेट करंडकाचा मोसम आता अंतिम टप्प्यात पोहोचत आहे. साखळी फेरीचा थरार सोमवारी आटोपल्यामुळे आता बाद फेरीला सुरुवात होणार आहे.
Ranji Trophy
Ranji Trophy sakal

मुंबई : यंदाचा रणजी क्रिकेट करंडकाचा मोसम आता अंतिम टप्प्यात पोहोचत आहे. साखळी फेरीचा थरार सोमवारी आटोपल्यामुळे आता बाद फेरीला सुरुवात होणार आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतींना २३ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारे आठही संघ निश्‍चित झाले असून सर्वाधिक ४१ वेळा विजेतेपद पटकावलेल्या मुंबईच्या संघासमोर बडोद्याचे आव्हान असणार आहे.

मुंबईने यंदाच्या रणजी मोसमातील साखळी फेरीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सात सामन्यांमधून पाच लढतींमध्ये विजय मिळवताना ‘ब’ गटामध्ये ३७ गुणांसह अव्वल स्थान पटकावत बाद फेरीत प्रवेश केला आहे. मुंबईने २०१५-१६ मध्ये अखेरचे रणजी विजेतेपद पटकावले आहे. आता आठ वर्षांनंतर पुन्हा एकदा या बलाढ्य संघाला विजेतेपदाची आशा बाळगता येणार आहे. कर्णधार अजिंक्य रहाणेच्या बॅटमधून धावा निघत नसल्या तरी भूपेन लालवानी, पृथ्वी शॉ, तनुष कोटियन यांची दमदार फलंदाजी व शिवम दुबे, शम्स मुलानी यांची अष्टपैलू चमक आणि मोहित अवस्थी, रॉयस्टन डियास यांची प्रभावी गोलंदाजी मुंबईच्या दिमतीला आहे. त्यामुळे मुंबईचा विजेतेपदाचा दुष्काळ यंदा संपण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, बडोद्याने ‘ड’ गटातून २४ गुणांसह दुसरे स्थान मिळवत बाद फेरीत प्रवेश केला आहे.

Ranji Trophy
Rohit Sharma : त्याला खेळू द्या, नंतर बोलू या ,रोहित शर्मा ; फॉर्मात असलेल्या यशस्वी जयस्वालबाबत भारतीय कर्णधाराचा सावध पवित्रा

इतर लढतींवर दृष्टिक्षेप

विदर्भाने २०१७-१८, २०१८-१९ या वर्षांमध्ये रणजी विजेते होण्याचा मान संपादन केला होता. त्यानंतर मात्र त्यांना या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचता आले नाही. विदर्भाला उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत कर्नाटकशी दोन हात करावे लागणार आहेत. कर्नाटकने २०१४-१५ मध्ये अखेरचे रणजी विजेतेपद पटकावले होते. गतविजेत्या सौराष्ट्राला तमिळनाडूचा सामना करावा लागणार आहे. तसेच २०२१-२२ चा विजेता संघ मध्य प्रदेशचा संघ आंध्रशी लढणार आहे.

महाराष्ट्र पराभवापासून वाचला

महाराष्ट्राचा संघ ‘अ’ गटातील अखेरच्या साखळी फेरीच्या लढतीत पराभवापासून वाचला. महाराष्ट्राच्या संघाचा पहिला डाव २२५ धावांवर गुंडाळल्यानंतर सेना दलाने पहिल्या डावात ४३२ धावा फटकावल्या. महाराष्ट्राची अखेरच्या दिवशी ६ बाद १५७ धावा अशी अवस्था झाली. अर्शिन कुलकर्णीने ५८ धावांची, कौशल तांबेने ४४ धावांची खेळी साकारली. अखेर सामना अनिर्णित राहिला. सेना दलाने तीन गुणांची व महाराष्ट्राने एक गुणाची कमाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com