Ranji Trophy : शार्दुलच्या ‘बॅझबॉल’ने मुंबईला सावरले...! रहाणे, अय्यर अपयशी

Ranji Trophy 2024 Mumbai vs Tamil Nadu Semi Final : दुसरा दिवस पहिले सत्र... सात बाद १०६ धावा... यजमान मुंबई संघाचा पाय खोलात... अशा संकटमय परिस्थितीत शार्दुल ठाकूरने ‘बॅझबॉल’ स्टाईल आक्रमक ऐतिहासिक खेळी साकारली आणि रणजी उपांत्य लढतीचा नूरच बदलून टाकला.
Mumbai vs Tamil Nadu Ranji Trophy Semi Final Marathi News
Mumbai vs Tamil Nadu Ranji Trophy Semi Final Marathi News

Mumbai vs Tamil Nadu Ranji Trophy Semi Final : दुसरा दिवस पहिले सत्र... सात बाद १०६ धावा... यजमान मुंबई संघाचा पाय खोलात... अशा संकटमय परिस्थितीत शार्दुल ठाकूरने ‘बॅझबॉल’ स्टाईल आक्रमक ऐतिहासिक खेळी साकारली आणि रणजी उपांत्य लढतीचा नूरच बदलून टाकला. त्याने आठव्या विकेटसाठी हार्दिक तामोरेच्या (३५ धावा) साथीने १०५ धावांची अन्‌ त्यानंतर तनुष कोटियनच्या (नाबाद ७४ धावा) साथीने ७९ धावांची भागीदारी रचताना तमिळनाडूच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले.

शार्दुलने १०५ चेंडूंमध्ये १३ चौकार व चार षटकारांसह आपली १०९ धावांची खेळी सजवली आणि यजमान संघ मुंबईला भक्कम स्थितीत नेऊन ठेवले. आता मुंबईच्या संघाने दुसऱ्या दिवसअखेरीस नऊ बाद ३५३ धावा केल्या असून, त्यांच्याकडे २०७ धावांची आघाडी आहे.

तमिळनाडूचा पहिला डाव १४६ धावांमध्ये गुंडाळल्यानंतर मुंबईची अवस्था पहिल्या दिवसअखेरीस दोन बाद ४५ धावा अशी झाली होती. सकाळच्या सत्रात नाईट वॉचमन म्हणून फलंदाजी करणारा मोहित अवस्थी साई किशोरच्या गोलंदाजीवर दोन धावांवरच यष्टिचीत झाला.

ढगाळ वातावरण असतानाही साई किशोर याने वेगवान गोलंदाजांना संधी न देता स्वत:कडे चेंडू ठेवला, यामुळे क्रिकेटतज्ज्ञांच्या भुवया उंचावल्या; पण पहिल्या सत्रात त्याने प्रभावी कामगिरी करताना आपला निर्णय योग्य असल्याचे दाखवून दिले. त्याने पहिल्या सत्रात १७ षटकांमध्ये फक्त २८ धावा देत चार फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

रहाणे, अय्यर अपयशी

मुंबईला सकाळच्या सत्रात दोन मोठे धक्के बसले. साई किशोरच्या गोलंदाजीवर फ्रंटफूटवर बचाव करण्याच्या प्रयत्नात अजिंक्य रहाणे पहिल्या स्लीपमध्ये उभ्या बाबा इंद्रजितकरवी झेलबाद झाला. ६७ चेंडूंचा सामना करताना त्याने फक्त १९ धावा केल्या. सुमार फॉर्म कायम राहिला. त्यानंतर बीसीसीआयच्या करारातून वगळण्यात आलेल्या श्रेयस अय्यरलाही सूर गवसला नाही. संदीप वॉरियरच्या गोलंदाजीवर त्याचा तीन धावांवरच त्रिफळा उडाला. या दरम्यान मुशीर खानने सहा चौकारांसह ५५ धावांची खेळी करीत मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला; पण साई किशोरने त्याच्यासह शम्स मुलानीलाही बाद करीत मुंबईला अडचणीत टाकले.

दोन भागीदाऱ्या अन्‌ सामन्याला कलाटणी

शार्दुल ठाकूर याने या डावात दोन महत्त्वपूर्ण भागीदाऱ्या रचल्या. हार्दिक तामोरेच्या साथीने आठव्या विकेटसाठी १०५ धावांची आणि त्यानंतर तनुष कोटियनच्या साथीने ७९ धावांची भागीदारी करताना शार्दुलने तमिळनाडूच्या गोलंदाजांचे आव्हान लीलया परतवून लावले. साई किशोरच्या गोलंदाजीवर हार्दिक ३५ धावांवर बाद झाला. शार्दुलने पहिलवहिले शतक झळकावताना १३ चौकार व चार षटकारांची आतषबाजी केली. कुलदीप सेनच्या गोलंदाजीवर तो बाद झाला.

विक्रमी जोडी पुन्हा जमली

तनुष कोटियन व तुषार देशपांडे यांनी मागील लढतीत अखेरच्या विकेटसाठी २३२ धावांची विक्रमी भागीदारी रचली होती. पुन्हा एकदा ही जोडी मैदानावर उतरली आहे. या दोघांनी अखेरच्या विकेटसाठी आतापर्यंत नाबाद ६३ धावांची भागीदारी रचली आहे. उद्या (ता. ४) सकाळच्या सत्रात ही जोडी आणखी किती धावांची भर घालतेय हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

संक्षिप्त धावफलक : तमिळनाडू - पहिला डाव १४६ धावा. मुंबई - पहिला डाव - ९ बाद ३५३ धावा (मुशीर खान ५५, अजिंक्य रहाणे १९, हार्दिक तामोरे ३५, शार्दुल ठाकूर १०९ - १०५ चेंडू, १३ चौकार, ४ षटकार, तनुष कोटियन खेळत आहे ७४, तुषार देशपांडे खेळत आहे १७, साई किशोर ६/९७).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com