नवी दिल्ली : भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज हरभजनसिंगने 'खेल रत्न' पुरस्कारासाठी केलेला अर्ज क्रीडा मंत्रालयाने फेटाळला आहे. त्याचबरोबर, धावपटू द्युती चंदचाही 'अर्जुन' पुरस्कारासाठी विचार झालेला नाही. याशिवाय, पुरुषांच्या 800 मीटर स्पर्धेतील धावपटू मंजितसिंगलाही 'अर्जुन' पुरस्कारांसाठीच्या यादीत स्थान मिळालेले नाही.
खेल रत्न आणि अर्जुन पुरस्कारासाठी पात्र उमेदवारांची यादी तयार करण्याचे काम सध्या क्रीडा मंत्रालयामध्ये सुरू आहे. ही प्राथमिक यादी तज्ज्ञांच्या समितीकडे पाठविली जातील. त्यानंतर निवडलेल्या खेळाडूंच्या नावांना अंतिम मंजुरीसाठी क्रीडा मंत्री किरण रिजीजू यांच्याकडे पाठविले जाईल.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) यंदा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमरा, महंमद शमी, रवींद्र जडेजा आणि महिला क्रिकेटपटू पूनम यादव यांची नावे 'अर्जुन'साठी पाठविली आहेत. यंदा 'खेल रत्न'साठी 'बीसीसीआय'ने कुणाचीही शिफारस केलेली नाही. हरभजनसिंगच्या नावाची शिफारस पंजाब सरकारने केली होती. पण पंजाब सरकारने हा अर्ज 25 जून रोजी केला होता. 'खेल रत्न'साठी अर्ज करण्याची मुदत 30 एप्रिल होती.
भारतीय ऍथलेटिक्स संघटनेला (एएफआय) नियमानुसार तीन नावांची शिफारस करता येते. यंदा त्यांनी पाच खेळाडूंची शिफारस केली होती. यामध्ये द्युती आणि मंजितसह तेजिंदरपालसिंग, स्वप्ना बर्मन आणि अर्पिंदर सिंह यांची शिफारस झाली होती. खेळाडूंच्या कामगिरीनुसार 'एएफआय'ने क्रमवारी तयार करून ही नावे दिली होती. त्यानुसार, पहिली तीन नावे स्वीकारण्यात आली. निवड झालेल्या खेळाडूंनी आपापल्या क्रीडा प्रकारामध्ये आशियाई स्पर्धा आणि इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्ण जिंकले होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.