विशाखापट्टणम : विंडीजविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात झालेला पराभव भारताच्या चांगला जिव्हारी लागला. त्यातूनच प्रेरणा घेत भारतीय संघाने आज तुफान फटकेबाजी करत विंडीजला 388 धावांचे आव्हान दिले. ही विशाखापट्टणमधील सर्वांत जास्त धावसंख्या आहे. यापूर्वी 370 धावांचा विक्रम आहे.
भारताची सलामीची जोडी रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांच्या भक्कम भागीदारीवर आणि त्यानंतर अखेर षटकांत रिषभ पंत आणि श्रेयस अय्यरने केलेल्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर भारताने 387 धावांचा टप्पा गाठला.
नाणेफेक जिंकून विंडीजने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो त्यांच्या चांगलाच अंगलट आला. रोहित शर्मा आणि राहुल यांनी विंडीजच्या गोलंदाजांवर हल्ला करण्यास सुरवात केली. सर्वप्रथम रोहितने 107 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. त्यापाठोपाठ राहुलनेही 102 चेंडूंत शतक पूर्ण केले.
शतक पूर्ण केल्यावर लगेच राहुल 102 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला कर्णधार विराट कोहली पहिल्याच चेंडूवर गोल्डन डकवर बाद झाला. रोहित शर्मा मात्र, शतक पूर्ण केल्यावर आणखी सुसाट फलंदाजी करायला लागला. तो 136 चेंडूंमध्ये 159 धावा करुन तो बाद झाला.
अखेरच्या षटकांत रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांनी तुफान फटकेबाजी केली. पंतने 46व्या षटकात दोन षटकार आणि चार चौकार मारले. त्यानंतर अय्यरनेही चार षटकार आणि एक चौकार खेचला. रिषभ पंत 39 धावांवर बाद झाला तर अय्यरने अर्धशतक पूर्ण केले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.