
IND vs AUS 3rd Test : इंदूर कसोटी BCCI ला मान खाली घालायला लावणार; ICC सामनाधिकारी मोठ्या कारवाईच्या तयारीत
IND vs AUS Indore Pitch : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीचे दोन दिवस झाले आहेत. या दोन दिवसात 30 विकेट्स पडल्या. इंदूरच्या होळकर स्टेडियमची खेळपट्टी ही लाल मातीची खेळपट्टी म्हणून ओळखली जाते. या खेळपट्टीवर फिरकीबरोबरच वेगवान गोलंदाजांना देखील चांगली उसळी मिळते अशी याची ख्याती होती. मात्र बॉर्डर - गावसकर ट्रॉफीमधील तिसऱ्या कसोटीत वेगळाच सीन पहायला मिळाला.
पहिल्या सत्रापासून इंदूरची खेळपट्टी फिरकीपटूंना उसळी आणि फिरकी मिळवून देऊ लागली. यामुळे पहिल्या दोन सत्रातच भारताचा पहिला डाव 109 धावात खल्लास झाला. त्यानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी झुंजार फलंदाजी करत पहिला दिवसावर वर्चस्व गाजवले. मात्र दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्राच्या शेवटी खेळपट्टीने आपला जलवा पुन्हा दाखवला आणि कांगारूंचे 6 फलंदाज 11 धावात गारद झाले.
भारताने दुसऱ्या डावात आपल्या फलंदाजीत सुरू केली. पहिल्या डावापेक्षा दुसऱ्या डावात भारताने बरी फलंदाजी केली. मात्र भारताला 200 चा टप्पा काही पार करता आला नाही. तसं ऑस्ट्रेलियालाही पहिल्या डावात 200 धावांचा टप्पा पार करता आला नव्हता. अखेर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी दोन्ही संघाच्या मिळून 30 विकेट्स पडल्या. याचा फटका आता बीसीसीआयला बसण्याची शक्यता आहे.
आयसीसी सामना अधिकारी ख्रिस ब्रॉड हे कारवाईच्या मोडमध्ये आहेत. ते इंदूरच्या खेळपट्टीला सुमार दर्जापेक्षाही खालची असं रेटिंग देण्याची शक्यता आहे. यामुळे बीसीसीआयचे नाक कापले जाण्याचीही शक्यता आहे. इंदूर कसोटीच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला जरी 76 धावाच करायच्या आहेत. मात्र तिसऱ्या दिवशी देखील विकेट्सचा पाऊस पडेल असा अंदाज आहे.
हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...