विशाखापट्टणम : रोहित शर्मा, मयांक अगरवाल या फलंदाजांनी रचलेल्या पायावर रवींद्र जडेजा, आर. अश्विन या गोलंदाजांनी कळस चढवत, दक्षिण आफ्रिकेला पहिल्या कसोटी सामन्यात 203 धावांनी धूळ चारली. आज, शेवटच्या दिवशी पहिल्या सत्रात जडेजाने एकाच ओव्हरमध्ये तीन विकेट् घेऊन, भारताला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. पण, आफ्रिकेच्या शेवटच्या दोन फलंदाजांनी चिवटपणा दाखवत भारतीय गोलंदाजांची दमछाक केली. त्यामुळे भारताचा विजय लांबला.
अनुभवी अश्विनची कामगिरी
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 502 या धावसंख्येवर डाव घोषित केला होता. मयांक अगरवालने 215 तर, रोहित शर्माने 176 धावा करत, भारताला सर्वोत्तम सरुवात करून दिली होती. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 317 धावांची विक्रमी भागीदारी केली होती. त्यानंतर, आफ्रिकेला पहिल्या डावात 431 धावांवर गुंडाळण्यात भारताला यश आले होते. अनुभवी आर. अश्विनने सात विकेट् अफ्रिकेच्या बॅटिंग लाईनचे कंबरडे मोडले होते.
जडेजा, शमीनं जिंकलं
त्यानंतर भारताने दुसऱ्या डावातही चांगला खेळ केला. या डावातही 127 धावा करून रोहित शर्माने सामन्यात दुसरे शतक झळकावले होते. त्याला पुजाराने 81 धावा करून चांगली साथ दिली होती. भारताने 323 धावा करून, आफ्रिकेला 395 धावांचं लक्ष्य दिलं होतं. काल चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा, आफ्रिकेने एक बाद 11 अशी सावध सुरुवात केली होती. आज सकाळी खेळ सुरू झाल्यानंतर मात्र, आफ्रिकेचे फलंदाज एका पाठोपाठ एक माघारी परतले. एडन मार्करम, डीब्रुईन, डुप्लेसीस, डीकॉक यांपैकी एकही फलंदाज खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजाने सकाळच्या सत्रात आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर पाय रोवू दिला नाही. पण, केशव महाराज आणि डीएल पिडिट् यांनी नवव्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी करून भारताची डोकेदुखी वाढवली. पिडिट्ला बोल्ड करून, ही जोडी फोडली. अखेर मोहम्मद शमीने रबाडाला वृद्धीमान साहा करवी झेलबाद करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
दृष्टीक्षेपात सामना
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.