
IND vs SL 2nd T20I : श्रीलंकेचा 2016 नंतरचा भारतात पहिला विजय; अक्षर - मावीची झुंज व्यर्थ
India vs Sri Lanka 2nd T20I : भारत आणि विजय यांच्यात आजच्या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दसुन शानका हा काळ बनून उभा राहिला. शानकाने फलंदाजी करताना शेवटच्या षटकात 21 धावा चोपल्या तर भारताला विजयासाठी 21 धावांची गरज असताना त्याने शेवटचे षटक टाकत फक्त 4 धावा देत सामना जिंकून दिला. श्रीलंकेने भारतात 2016 नंतर पहिल्यांदाच टी 20 मध्ये विजय मिळवला आहे.
तत्पूर्वी, श्रीलंकेचा कर्णधार दसुन शानकाने 22 चेंडूत नाबाद 56 धावा ठोकत भारतासमोर 207 धावांचे आव्हान ठेवले. श्रीलंकेने शेवटच्या 5 षटकात तब्बल 77 धावा चोपल्या. भारताकडून उमरान मलिकने 3 आणि अक्षर पटेलने 2 विकेट्स घेतल्या. मात्र अर्शदीपने दोन षटकात 5 नो बॉल टाकले. तर शिवम मावी आणि उमरान मलिक यांनी प्रत्येकी 1 नो बॉल टाकला. इथेच भारताने नो बॉल अन् फ्रि हिटवर 22 पेक्षा जास्त धावा दिल्या.
भारताने नाणेफेक जिंकली
भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यात भारतीय संघात एक बदल आहे. जखमी संजू सॅमसनऐवजी राहुल त्रिपाठीला पदार्पणाची संधी मिळणार आहे.
दुसरे षटक टाकणाऱ्या अर्शदीपचा कहर
दुसऱ्या सामन्यात हर्षल पटेलच्या जागेवर आलेल्या अर्शदीप सिंगने सामन्याच्या दुसऱ्याच षटकात सलग 3 नो बॉल टाकले. त्यातील दोन चेंडूवर तर षटकार आणि चौकार देखील खालला. त्याने दुसऱ्या षटकात तब्बल 19 धावा दिल्या.
SL 59/0 (6.2) : लंकेची दमदार सुरूवात
अखेर चहलने जोडी फोडली
श्रीलंकेच्या कुसल मेंडीस आणि निसंका या सलामी जोडीन 8.2 षटकात तब्बल 80 धावा ठोकत दमदार सुरूवात केली. अखेर 31 चेंडूत 51 धावांची आक्रमक खेळी करणाऱ्या कुसल मेंडीसला युझवेंद्र चहलने बाद केले.
SL 83/2 (9.1) : उमरान मलिकने उडवला त्रिफळा
युझवेंद्र चहल पाठोपाठ उमरान मलिकने पुढच्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर भानुका राजपक्षाचा त्रिफळा उडवत भारताला दुसरे यश मिळवून दिले.
138-5 : उमरानची कमाल
निसंकाला अक्षरने बाद केल्यानंतर असलंकाने आक्रमक फलंदाजी करत श्रीलंकेचा डाव 3 बाद 96 धावांपासून सावण्यास सुरूवात केली होती. त्याने 19 चेंडूत 37 धावा चोपल्या होत्या. मात्र उमरान मलिकने त्याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर वानिंदू हसरंगाला बाद करत आपला तिसरा बळी टिपला.
कर्णधाराची धुवांधार खेळी
श्रीलंकेचा कर्णधार दसुन शानकाने 22 चेंडूत 56 धावांची नाबाद खेळी करत शेवटच्या 5 षटकात भारताच्या नाकात दम केला. त्याच्या या खेळीमुळे भारतासमोर 20 षटकात विजयासाठी 207 धावांचे आव्हान उभे राहिले.
21-3 : भारताला पॉवर प्लेमध्येच 3 धक्के
श्रीलंकेचे 207 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतला पहिल्या तीन षटकातच तीन धक्के बसले. कुसल रजिताने इशान किशन (2), शुभमन गिल (5) यांना बाद करत दोन्ही सलामीवीर माघारी धाडले. त्यानंतर पदार्पण करणाऱ्या राहुल त्रिपाठीला दिलशान मधुशनकाने 5 धावांवर बाद करत भारताची अवस्था 3 बाद 21 धावा अशी केली.
34-4 : भारताचा कर्णधार देखील माघारी
भारताचा कर्णधार हार्दिक पांड्याने चमिरा करूणारत्नेच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारत चांगली सुरूवात केली. मात्र मचिराने त्यानंतर पांड्याला 12 धावांवर बाद करत भारताला पाचव्या षटकात चौथा धक्का दिला.
57-5 : दीपक हुड्डा स्वस्तात माघारी
पहिल्या सामन्यातील हिरो दीपक हुड्डा दुसऱ्या सामन्यात मात्र 12 चेंडूत 9 धावा करून बाद झाला. त्याला हसरंगाने बाद केले.
अक्षरचा धडाका, सूर्यासोबत भागीदारी
भारताचा निम्मा संघ माघारी गेल्यानंतर आलेल्या अक्षर पटेल आणि सूर्यकुमार यादव यांनी भारताचा डाव सावरला. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचत सघाला शतक पार पोहचवले.