INDvWI : श्रेयस-रिषभ धावले मदतीला; भारताची 287 पर्यंत मजल

INDvWI-Pant-Iyer
INDvWI-Pant-Iyer

चेन्नई : तीन दिवसांपूर्वी मुंबईत मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार रोहित-राहुल-विराट हे तिन्ही फलंदाज अपयशी ठरल्यावर श्रेयस अय्यर-रिषभ पंत या नवोदितांनी टीम इंडियाच्या फलंदाजीची धुरा सांभाळली आणि वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने 3 बाद 80 वरून 8 बाद 287 अशी मजल मारली.

चेंडू थांबून येणाऱ्या खेळपट्टीवर फटकेबाजी करणे अवघड होते त्यामुळे मुंबईतील रोहित-राहुल-विराटच्या एक्स्प्रेसला आज चेन्नईत ब्रेक लागले, परंतु अय्यर आणि पंत यांनी संयमातही आक्रमकता दाखवत शानदार शतकी भागीदारी करून भारताची मधली फळीही दडपण सांभाळण्यास समर्थ असल्याचे दाखवून दिले. 

वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिन्ही ट्वेन्टी-20 सामन्यात नाणेफेक गमावणाऱ्या विराट कोहलीला आजही दैवाने साथ दिली नाही. त्यामुळे प्रथम फलंदाजी करावी लागली. काल येथे जोरदार पाऊस पडलेला असल्यामुळे हवामान नवा चेंडू स्वींग होण्यास मदत करणारे होते. त्यातच चिपॉकची खेळपट्टी आपल्या संथपणाचा गुणधर्म कायम ठेवणारा होता. त्याचा परिणाम आक्रमक शैलीच्या केएल राहुल आणि रोहित शर्मा यांच्यावर झाला.

तीन दिवसांपूर्वी मुंबईत या दोघांनी घणाघाती सलामी दिली होती आज मात्र संथ खेळपट्टीमुळे 21 धावांवरच ही जोडी फुटली. राहुल सहव्या षटकात बाद झाला; परंतु त्यापेक्षा भारताला मोठा धक्का पुढच्या षटकात बसला कॉड्रेलनने विराट कोहलीलाही अवघ्या चार धावांवर बाद केले. दुसऱ्या बाजुला रोहित शर्माने टायमिंगची जुळवाजुळव करून सहा चौकारांसह 36 धावांची खेळी केली; परंतु तोही बाद झाला. तेव्हा 18 षटकांचाच खेळ झाला होता. 

तीन प्रमुख फलंदाज 80 धावांत परतल्यावर पुढच्या फलंदाजाना संयमावर भर देणे अपरिहार्य होते. श्रेयस अय्यरने या पडझडीत संघाची धुरा सांभांळली पण त्याने धावांची गती कोठेही कमी होऊ दिली नाही. दुसऱ्या बाजूला रिषभ पंतनेही चांगलाच संयम दाखवला. एरवी परिस्थिती कशीही असली तरी उतावीळ फटका मारून विकेट गमावणारा पंत आज संतुलीत दिसून आला. तरिही अय्यर-पंत यांनी शतकी भागीदारीसाठी 103 चेंडू घेतले. 
जम बसल्यावर पंतने आपली हुकमी फटकेबाजी सुरु केली.

यावेळी त्याच्यासह अय्यरकरूनही शतकाची अपेक्षा होती, परंतु अय्यरही रोहितप्रमाणे कमी वेगाने आलेल्या चेंडूवर बाद झाला. त्यानंतर पंत षटकाराच्या प्रयत्नात माघारी फिरला. पण या दोघांनी संघाची धावसंख्या अडीचशे पार जाईल याची पायाभरणी केली.

डावाच्या उत्तरार्धात विंडीज गोलंदाजांनी चेंडूंचा वेग कमी केला, परंतु अनुभवी केदार जाधवने 35 चेंडूत 40 धावांची केलेली खेळी भारतासाठी मोलाची ठरली.

संक्षिप्त धावफलक : 

भारत 50 षटकांत 8 बाद 287 (रोहित शर्मा 36 -56 चेंडू, 6 चौकार, केएल राहुल 6, विराट कोहली 4, श्रेयस अय्यर 70 -88 चेंडू, 5 चौकार, 1 षटकार, रिषभ पंत 71 -69 चेंडू, 7 चौकार, 1 षटकार, केदार जाधव 40 -35 चेंडू, 3 चौकार, 1 षटकार, रवींद्र जडेजा 21 -21 चेंडू, 2 चौकार, शेल्डन कॉट्रेल 10-3-46-2, कीमो पॉल  7-0-41-2, अलझारी जोसेफ 9-1-45-2

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com