IPL प्लेऑफसाठी ईडन गार्डन्स सज्ज; गुजरात-राजस्थानमध्ये सामना

पाऊस आला तर सुपर ओव्हरमध्ये निकाल
ipl gujarat titans rajasthan royals in qualifier
ipl gujarat titans rajasthan royals in qualifier

आयपीएलच्या प्लेऑफचे पहिले दोन सामने मंगळवार आणि बुधवारी ईडन गार्डन स्टेडियवर होत आहेत; परंतु येथे वादळी पावसाची शक्यता असल्यामुळे बीसीसीआयने नियमांची उजळणी केली आहे. एकाही षटकाचा खेळ होऊ शकला नाही तर गटसाखळीत वरच्या स्थानावर असलेल्या संघांना विजयी घोषित केले जाईल.

आज मंगळवारी गुजरात विरुद्ध राजस्थान यांच्यात क्वॉलिफायर-१ हा सामना, तर उद्या बुधवारी लखनौ आणि बंगळूर यांच्यात

एलिमिनेशचा सामना होणार आहे. विशेष म्हणजे या दोन्ही

सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेले नाहीत. गुणतक्त्यात गुजरात, राजस्थान आणि लखनौ, बंगळूर अशी क्रमवारी आहे. क्वॉलिफायर-२ आणि अंतिम सामना गुजरात येथे होणार आहे. २९ मे रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी ३० मे हा राखीव दिवस असणार आहे.

दरम्यान, उद्याच्या या लढतीत पराभूत संघाला क्वॉलिफायर-२ ही लढत खेळून अंतिम फेरी गाठण्यासाठी अजून एक संधी मिळणार आहे.

कोलकतामध्ये सध्या ढगाळ वातावरण आहे. उद्या मंगळवारी सकाळ आणि रात्रीही वादळी पावसाची शक्यता आहे. ६५ ते ६८ टक्के पावसाचा अंदाज अॅक्यूवेदरने व्यक्त केला आहे. बुधवारी मात्र सकाळी २५ टक्के तर रात्री म्हणजेच सामन्याच्या वेळी केवळ ३ टक्के पावसाचा अंदाज आहे.

कशी असेल वेळेची मर्यादा

सामने सुरू होण्याची नियोजित वेळ ७.३० आहे. जास्तीत जास्त रात्री ११.५६ पर्यंत कटॉफ वेळ असेल. ११.५६ पर्यंत खेळ होऊ शकला नाही तर कमीत कमी पाच षटकांचा खेळ ११.५६ पासून सुरू होणे आवश्यक आहे. पाच षटकांचाही खेळ होऊ शकला नाही तर सुपर ओव्हर जास्तीत जास्त मध्यरात्री १२.५० पर्यंत सुरू होऊ शकेल.

पावसासंदर्भात काय आहेत नियम

  • कमीत कमी पाच-पाच षटकांचा खेळ करण्यासाठी प्रयत्न

  • तेवढाही खेळ होऊ शकला नाही तर एक-एक षटकाची सुपर ओव्हर खेळवण्यात येईल.

  • सुपर ओव्हरही होऊ शकली नाही तर ७० साखळी सामन्यांत जो संघ पुढे होता त्या संघाला पुढे चाल दिली जाईल.

गुजरातला अधिक संधी ?

  • हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरातने गुणतक्त्यात आघाडी मिळवण्याचा पराक्रम केला असल्यामुळे उद्याच्या सामन्यात त्यांचे पारडे निश्चितच जड आहे. १४ साखळी सामन्यांपैकी १० सामने त्यांनी जिंकलेले असले तरी अखेरच्या लढतीत त्यांना बंगळूरकडून पराभव स्वीकारावा लागला आहे.

  • हार्दिक पंड्याचा हा संघ नवा असला तरी मुंबई इंडियन्सकडून खेळताना असे बाद फेरीचे सामने खेळण्याचा अनुभव हार्दिककडे आहे. त्यामुळे त्या दृष्टीने तो संघाची तयारी करून घेऊ शकेल. गुजरातला फलंदाजीची फारशी चिंता नाही, मात्र सलामीवीर शुभमन गिलने या निर्णायक सामन्यात योगदान देणे आवश्यक आहे. गुजरातची गोलंदाजीही तेवढीच ताकदवर आहे. मात्र आता अधिक अचूकता आणावी लागणार आहे.

  • दुसऱ्या बाजूला राजस्थानसाठी जोस बटलरने धावा करणे त्यांच्यासाठी आवश्यक आहे. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात १५० धावांचे लक्ष्य गाठताना त्यांची दमछाक झाली होती. आर. अश्विनच्या ४० धावांमुळे त्यांचा विजय साकार झाला होता. गुजरातप्रमाणे राजस्थानचीही गोलंदाजी समतोल आहे, त्यामुळे हा सामना चुरशीचा होऊ शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com