Kuldeep Yadav : भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या कसोटीत पहिल्या डावात 40 धावात 5 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे कुलदीप यादवने 20 महिन्यांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. त्याने बांगलादेशचा निम्मा संघ गारद केल्यामुळे बांगलादेशचा पहिला डाव 150 धावात संपुष्टात आला. आता भारताकडे पहिल्या डावात 254 धावांची भक्कम आघाडी आहे. दरम्यान, मध्यंतरी कुलदीप यादव संघात स्थान मिळत नसल्याने नाराज झाला होता. त्याने आपली नाराजी बोलून देखील दाखवली होती.
कुलदीप यादवने काही वर्षांपूर्वी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना नैराश्यात आत्महत्येची देखील भाषा केली होती. तो म्हणाला होता की, 'मी संघात निवड व्हावी म्हणून खूप कष्ट उपसले आहेत. मात्र माझी निवड झाली नाही. त्यावेळी मी नैराश्यात आत्महत्येचा विचार बोलून दाखवला होता. हे प्रत्येकाबाबत होते. तुम्ही भावनेच्या भरात बोलून जाता.'
कुलदीप यादव आपल्या क्रिकेट कारकिर्दिबद्द म्हणाला होता की, 'मी शाळेत नंबरात येणारा मुलगा होतो. मी क्रिकेट हे फक्त मजा म्हणून खेळत होतो. मी क्रिकेटकडे करिअरचा एक पर्याय म्हणून कधी पाहिलेच नव्हते. मात्र माझ्या वडिलांना मी क्रिकेटमध्ये कारकिर्द करावी असे वाटत होते. तेच माल प्रशिक्षकांकडे घेऊन गेले.'
कुलदीप पुढे म्हणाला की, 'मला सुरूवातीला वेगवान गोलंदाज व्हायचं होतं. मात्र प्रशिक्षकांनी माझ्यावर फिरकी टाकण्यासाठी दबाव टाकला. ज्यावेळी मी काही चायनामन बॉल टाकले त्यावेळी मला प्रशिक्षकांनी अशीच गोलंदाजी करण्याची सवय लावून घेण्यास सांगितले. त्यावेळी मला मी वेगळ्याच प्रकारची गोलंदीज करू शकतो हे माहिती नव्हते.'
कुलदीप यादवच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 254 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर केएल राहुलने बांगलादेशला फॉलोऑन न देता दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने तिसऱ्या दिवशीच्या उपहारापर्यंत नाबाद 36 धावा करत आपली आघाडी 290 धावांपर्यंत वाढवली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.